रत्नागिरीला लाभलेल्या समुद्र किनार्याची सर्वांनाच भुरळ पडते. अनेक जणांच स्वप्न असत कि अशा सुंदर समुद्रकिनारी, निवांत वातावरणामध्ये आपलं छोटस का असेना घर असावं. रत्नागिरीतील अनेक गावांना नदी,खाडी किंवा समुद्रकिनारा लाभला असल्याने तिथे पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात येतात, आणि त्यामुळे गावातील स्थानिकांनी छोटे मोठे विविध प्रकारचे उद्योग धंदे सुरु केले आहेत, अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा अशाच व्यवसायांवर चालतो आहे.
मागील दीड महिन्यांपासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि गुहागरचे माजी आमदार विनय नातू यांच्या रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत रिसोर्ट बांधकामाबद्दल चाललेल्या मंथनाबद्द्ल माजी आमदार कदम यांनी शोकांतिका व्यक्त केली आहे. राजकीय नेत्यांनी सत्तेत असताना पदाचा गैर वापर करून, शासकीय कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून आणि सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून तसेच जागेसाठी अनेक झाडांची कत्तल केली असे अनेक आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत. परंतु, या तक्रारींचा त्रास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे.
किरीट सोमय्या आणि विनय नातू यांनी केलेल्या वेगवेगळ्या तक्रारींमुळे मुरुड किनार्यावरील अनेकांना शासनाच्या सीआरझेडच्या नोटीसा बजावल्या गेल्या आहेत. राजकीय नेत्यांनी वैर जपण्यासाठी स्थानिकांचा दिला जात असलेला बळी, कितपत योग्य आहे ! आज अनेक वर्षे इथे किनाऱ्यावर घरे असलेली अनेक कुटुंबे घराला आर्थिक हातभार लागावा म्हणून विविध प्रकारचे व्यवसाय करताना दिसतात. पण आता आलेल्या सीआरझेडच्या नोटिसांमुळे हि कुटुंब बिथरून गेली आहेत, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि सरपंचांसह मी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची भेट घेऊन लेखी निवेदन देऊन कोकणाची किनारपट्टी उध्वस्त होण्यापासून वाचवावी, अशी विनंती करणार आहे. राजकारण्यांच्या वैरापाई सामान्य जनता त्यामध्ये भरडून जाता कामा नये.
माजी आमदार संजय कदम यांनी घडत असलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत सांगितले कि, किरीट सोमय्या यांनी सीआरझेड नियमभंग हाच सर्वांसाठी तक्रारीचा विषय धरल्याने, सरसकट तक्रारीमध्ये सामान्य जनतेची गळचेपी होत आहे. विनय नातू त्यांच्या प्रत्येक निवेदनाला साथ देत आहेत, ज्या जनतेने त्यांना इतकी वर्ष त्यांच्या कुटुंबावर विश्वास ठेवून निवडून दिले, त्याच नातूंनी कोकणच्या पर्यटनावर प्रश्न चिन्ह उभे करावे ! सध्या चोर सोडून, संन्याशाला फाशी अशी परिस्थिती निर्माण होउदे नको अशी कुजबुज सुरु आहे.