प्राथमिक शिक्षकांना बी. एल. ओ. कामातून वगळून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी लांजातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी केली असून या मागणीचे निवेदन लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांना मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी सादर करण्यात आले. लांजा तालुक्यात बी. एल. ओ. कामासाठी १०० टक्के कर्मचारी शिक्षकांना काढण्यात आलेले आहेत. सद्य:स्थितीत शिक्षकांची बरीच पदे रिक्त आहेत. एका शिक्षकाकडे दोन-दोन, तीन-तीन वर्ग तसेच काही ठिकाणी संपूर्ण शाळेचा कार्यभार आहे. शिक्षकांना अध्यापनाचे काम सांभाळून सातत्याने वेगवेगळी सव्हें क्षणे, शासनाच्या विविध योजना, सातत्याने येणारे नवनवीन उपक्रम त्यातच पुन्हा रोजचे असंख्य लेखी अहवाल, माहिती देणे यासारखी अनेक कामे करावी लागत असतात. यामध्ये भर म्हणून शिक्षकांना पुन्हा बी.एल.ओ. चे काम करावे लागत आहे.
या कामाचा शिक्षकांवर प्रचंड मानसिक व शारीरिक ताण येत आहे. याचा परिणाम शालेय कामकाजावर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गेली चार ते पाच वर्षे सातत्याने शिक्षक हे काम करत असून या कामासाठी अन्य विभागातील कर्मचारीही घेण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश असतानाही फक्त शिक्षकांनाच घेतल्याने तीव्र शिक्षक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शिक्षकांची रिक्त पदे तसेच शिक्षकांवर असलेल्या प्रचंड अशैक्षणिक कामांचा ताण लक्षात घेवून लांजा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना या कामातून तात्काळ मुक्त करण्यात यावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघटनांनी लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान निवेदन सादर करताना पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पावसकर, शिक्षक समितीचे जिल्हा कोषाध्यक्ष संतोष पावणे, पदवीधर संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय डांगे, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष उमेश केसरकर, उर्दू शिक्षक संघटनेचे खोडील यांच्यासह विजय कदम, उदय घाडी, मंगेश हटकर, सुदेश आयरे, संदीप घोरपडे, शैलजा तानवडे, मंगेश सरदेसाई, अनंत आंब्रे, अमित गराडे, सुधीर जाधव, संतोष पराडकर आदी संघटना पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.