शहरातील मिरकरवाडा प्रभागात विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रभागात रस्ते आहेत की नाही, असा प्रश्न माजी नगरसेवक सुहेल साखरकर यांनी व्यक्त केला आहे. ऐन गणेशोत्सवात खड्डेमय झालेल्या रस्त्यांचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यांसह या भागातील पथदीप चार महिन्यांपासून बंद आहेत. पालिका प्रशासनाचे या प्रभागाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप साखरकर यांनी केला आहे. मिरकरवाडा येथील प्रत्येक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. येथील राम मंदिर ते प्रसाद हॉटेल रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झाली आहे.
रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी वारंवार प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. मात्र अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात खड्डेमय रस्त्यांवरून वाहने हाकावी लागत आहेत. प्रशांत हॉटेल ते कावळे वाडी या भागातील पथदीप (स्ट्रीट लाईट) मागील चार महिने बंद आहेत. पालिका प्रशासनाकडे याबाबत तक्रार केल्यानंतर कर्मचारी येतात आणि केवळ पाहणी करून निघून जातात. आलेल्या भागातील फोटो काढून काम न करताच कर्मचारी निघून जात असल्याचे साखरकर यांचे म्हणणे आहे. मिरकरवाडा येथील समस्यांबाबत वारंवार पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र कर्मचारी प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात. या समस्या वेळीच सोडवल्या नाहीत तर मोर्चा काढणार असल्याचे साखरकर यांनी सांगितले.