तुम्ही द्याल तो उमेदवार निश्चित करू, असे मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्यामुळे रत्नागिरी तालुक्याच्या ठाकरे सेनेवर मोठी राजकीय जबाबदारी येऊन पडली आहे. उदय सामंत यांच्यासारखा तगड्या उमेदवाराविरुद्ध कोण लढणार, असा प्रश्न ठाकरे सेनेपुढे आहे. कोणत्याही जिल्हा परिषद गटामध्ये निवडून येण्याची ताकद असलेले उदय बने की ग्रामीण भागात सेना रुजविणारे तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी या दोन नावांची सध्या जोरदार चर्चा आहे. ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
कोणत्याही परिस्थित रत्नागिरी विधानसभेच्या गडावर भगवा फडकवायचा, अशी भिष्मप्रतिज्ञा मातोश्रीवर ठाकरे सेनेच्या शिलेदारानी घेतली. सर्व पदाधिकायांनी आतापासूनच कामाला लागा, असे उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. एकनाथ शिंदे आणि ठाकरे गट आता एकमेकासमोर ठाकणार आहेत. जुना शिवसैनिक आता इरेला पेटला आहे. तर सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी कामातून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. मंत्री, आमदारांना भरघोस निधी दिल्यामुळे विकास कामांचा सपाटा लावला आहे.
सामंतांच्या विरोधात लढण्यासाठी ठाकरे सेनेकडे सध्यातरी उदय बने किंवा बंड्या साळवी हे दोन उमेदवार आहेत. बने आणि साळवी ठाकरे शिवसेनेचे निष्ठावत असल्याने ग्रामीण भागात त्यांनी शिवसेना चांगली रुजवली आहे. त्यामुळे ठाकरे सेना रत्नागिरीत कोणाचे नाव निश्चित करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.