शहराच्या नियमित पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय येऊ नये, तसेच तरंगत्या पंपांचे पाणी कमी होऊ नये, यासाठी शीळ नदीवर पालिकेने बंधारा टाकला आहे. बंधाऱ्यामुळे तरंगत्या पंपांना मुबलक पाणी असल्याने नियमित पाणीपुरवठ्यामध्ये आता कोणतीही बाधा येणार नाही, याची खबरदारी पालिकेने घेतली आहे. शीळ जॅकवेल अचानक कोसळल्यामुळे शहरावर पाण्याचे मोठे संकट आले होते. अनेक भागांमध्ये तीन ते चार दिवस पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे नागरिकांची प्रचंड ओरड सुरू होती. विरोधकांनी हाच मुद्दा उचलून धरून मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले होते; परंतु नागरिकांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मात्र कोण पुढे आले नव्हते.
हे काम पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह त्यांच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी केले. पालिकेने पाच आणि उदय सामंत यांनी आठ पाणी टँकर देऊन शहरवासीयांना पाण्यासाठी पर्याय दिला. या टँकरमधून पालिकेच्या साठवण टाक्यांमध्ये पाणी सोडले जात होते. दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. शीळ जॅकवेल कोसळल्यामुळे पाणीयोजनेतील नवीन जॅकवेलमध्ये पाणी आणण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर होते. पालिका, मंत्री सामंत यांच्या पुढाकाराने त्यासाठी मुंबईतून स्पेशल टीम बोलावण्यात आली. या टीमने पाहणी केल्यानंतर शीळ नदीवर तरंगते पंप बसवण्याचा पर्याय दिला.
काही दिवसात या टीमने चार तरंगते पंप बसवले; परंतु या पंपांसाठी नदीमध्ये मुबलक पाणीसाठा असणे गरजेचे आहे. पावसाळा असल्यामुळे अडचणीच्या काळात पालिकेला पाणी अडवण्यासाठी काही करण्याची गरज भासली नाही; मात्र आता शीळ नदीचे पाणी अडवले तरच तरंगत्या पंपाना पाणी मिळणार आहे, है लक्षात घेऊन पालिकने शीळ नदीवरच बंधारा घालून वाहून जाणारे पाणी अडवले आहे. त्यामुळे तरंगत्या पंपांना अपेक्षित पाणीसाठा मिळाला असून, चारही पंपांद्वारे नवीन जॅकवेलमध्ये चांगला पाणीसाठा होऊन हे पाणी साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जात आहे.