जिल्ह्यातील २ लाख ८३ हजार ६९७ अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना गणपती बाप्पा पावला आहे. शासनाकडून या कार्डधारकांना गौरी-गणपती सणासाठी आनंदाचा शिधा जाहीर झाला आहे. १०० रुपयामध्ये हा आनंदाचा शिधा मिळणार आहे, तशी मागणी जिल्हा पुरवठा विभागाने कळवली आहे. सप्टेंबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने आनंदाचा शिधा वितरणास मुदतवाढ देता येणार नसल्याचे शासनाने कळवल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने सांगितले. राज्य शासनाने दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना देऊन दिवाळी गोड केली; परंतु शिधासंच वेळेत न आल्याने वितरण व्यवस्थेत गोंधळ झाला.
सर्वसामान्य व गरीब जनतेचा सणांचा गोडवा अधिक वाढावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘आनंदाचा शिधा’ ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षीदेखील गौरी-गणपती काळातही लाभार्थ्यांना शंभर रुपयांत साखर, तेल, रवा व डाळ अशी प्रत्येकी’ एक किलोप्रमाणे ‘आनंदाचा शिक्षा’, संच दिला होता. गेल्यावर्षी दिवाळीत दिलेल्या ‘आनंदाचा शिधा’ संचामध्ये, यावर्षी पोहे व मैदा या अधिकच्या दोन वस्तूंसह सहा वस्तू देण्याचे शासनाने निश्चित केले आहे.
पत्र जिल्हा पुरवठा विभागाला – यंदाच्या गौरी-गणपतीलाही शासनाने आनंदाचा शिधा वाटप करण्याची जाहीर केले आहे. त्याबाबतचे पत्र जिल्हा पुरवठा विभागाला मिळाले आहे. यामध्ये अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक ३८ हजार ८५४ आहेत. तर प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारक २ लाख ४४ हजार ८४३ आहेत. जिल्ह्यातील या २ लाख ८३ हजार ६९७ कार्डधारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिली.