गणेशोत्सवासाठी गावी आलेले चाकरमानी सीएनजी पंपावर अडकले आहेत. शिवाजीनगर येथील पंपावर पहाटे पाच वाजेपासून तब्बल चार किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. आठ तासानंतरही सीएनजी मिळत नसल्यामुळे वाहनचालकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. चिपळूणमध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सीएनजीचे केवळ दोनच पंप आहेत. यातील एक पंप हा अधूनमधून दुरुस्तीसाठी बंद असतो. गणेशोत्सव काळात हा पंप बंद असल्यामुळे शिवाजीनगर येथील एका पंपावर प्रचंड भार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्यासह मोठ्या शहरातील अनेक गणेशभक्त आपली स्वतःची वाहने घेऊन गावी आले आहेत.
यातील बहुसंख्य गणेशभक्तांची वाहने सीएनजीवर चालतात. ते सीएनजी भरण्यासाठी पंपावर रांगा लावत आहेत; मात्र त्यांना वेळेवर सीएनजी उपलब्ध होत नाही. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या वाहनाच्या रांगा लागत आहेत. भरपावसात सीएनजीसाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील अनेक रिक्षा आणि चारचाकी वाहने सीएनजीवर चालतात. एकाच पंपावर सीएनजी उपलब्ध होत असल्यामुळे त्यांनाही रांगेत उभे राहावे लागत आहे. ग्रामीण भागातून सीएनजीसाठी शहरांमध्ये आलेले रिक्षाचालक दुपारी दोन वाजेपर्यंत उभे होते. त्यांचा निम्मा दिवस केवळ सीएनजी भरण्यात गेल्यामुळे गणेशोत्सव काळातील त्यांचा दिवसाचा व्यवसायही पाण्यात गेला आहे.
सीएनजी मिळणार कधी आणि गावी जाऊन भाडे मारायचे कधी, असा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. गणेशोत्सव काळात गावी आलेल्या चाकरमान्यांना आपल्या नातेवाईकांकडे जाऊन त्यांची भेट घेण्याची इच्छा असते; मात्र वाहनांमध्ये सीएनजी उपलब्ध होत नसल्यामुळे नातेवाईकांकडे जाण्याचा प्रवास ते टाळत आहेत. अनेकांना पाच दिवसाच्या गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर शहराकडे परतायचे आहे. ते अगोदर आपल्या वाहनांमध्ये सीएनजी भरून ठेवत आहेत. त्यामुळे सीएनजी पंपावर लांबच्या लांब रांगा लागत आहेत.