कोकणात पाऊस आणि वणवा या दोघांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पडलेला पाऊस जमिनीत कसा मुरेल आणि वणवे लागू नयेत म्हणून लोकांमध्ये जानजागृती कशी होईल, यावर विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले. ते देवरूख येथे पार पडलेल्या पहिल्या वसुंधरा मित्रसंमेलनात बोलत होते. सृष्टीज्ञान संस्था, सह्याद्री संकल्प सोसायटी, आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय यांच्या वतीने याचे आयोजन केले होते. या संमेलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वसुंधरा मित्रांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाचे उद्घाटन आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र तेंडोलकर, किरण शेलार यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर शेलार यांच्या अध्यक्षतेंतर्गत वन्यजीव-सहजीवन, आव्हाने आणि मार्ग हा परिसंवाद पार पडला.
यामध्ये श्रीनाथ कवडे यांनी मानव-वन्यजीव संघर्ष, डॉ. अरुण चांदोरे यांनी सडे संवर्धन, डॉ. कुमार विनोद गोसावी यांनी गवतावर आधारित उपजीविका, डॉ. अमित मिरगळ यांनी पर्यावरणीय कायदे आणि कार्बन क्रेडिट्स, डॉ. मकरंद ऐतवडे यांनी रानभाज्या संवर्धन, सचिन चोरगे यांनी पारंपरिक बियाणे, पूजा पवार यांनी पक्षी संवर्धन आणि लक्ष्मीकांत देशपांडे यांनी पर्यावरणीय कामांना मिळणारे आर्थिक पाठबळ याविषयी मत मांडले. या परिसंवादाचे संचलन आययूसीएनच्या हॉर्नबिल स्पेशालिस्ट ग्रुपचे सदस्य प्रतीक मोरे यांनी केले.
शेतकरी, अभ्यासकांसह संस्थांचा सन्मान – पर्यावरणाच्या विविध क्षेत्रांत काम करणारे तज्ज्ञ, शेतकरी, स्थानिक संस्था आणि स्थानिक लोकांचा विविध श्रेणीतील पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. त्यात पूजा पवार, महेंद्र चव्हाण, नितीन नार्वेकर, विशाल सडेकर यांना वसुंधरा मित्र निसर्गरक्षक पुरस्काराने, लक्ष्मण झोरे आणि संदेश झेपले यांचा वसुंधरा मित्र निसर्गरक्षक शिक्षक पुरस्कार, दत्ताराम चौगले, अभिजित पाटील, जिद्द महिला बचतगट, प्रसाद खेडेकर, धनंजय कानिटकर, सचिन चोरगे यांना वसुंधरा मित्र निसर्गरक्षक शेतकरी पुरस्कार, पर्यावरण पत्रकार अक्षय मांडवकर, पत्रकार अमोल मोरे, पत्रकार जितेंद्र पराडकर, दै. ‘सकाळ’चे उपसंपादक राजेश कळंबटे यांना वसुंधरा मित्र निसर्गरक्षक पत्रकार पुरस्कार आणि सदानंद भागवत, सतीश कामत, मदन मोडक, भाऊ काटदरे, युयुत्सू आर्ते, अर्चना गोडबोले यांचा वसुंधरा मित्र निसर्गरक्षक कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.