लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील स्वयंभू मार्लेश्वर तीर्थक्षेत्री (शिखर) येथे श्रीदेव चि. मार्लेश्वर आणि चि. सौ. का. गिरिजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) मंगळवारी दुपारी १.१६ वाजण्याच्या मुहुर्तावर हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडला. यावेळी मंगल वाद्यांचा गजर करण्यात आला. आपल्या देवाचे लग्न याची देही याची डोळा पाहण्यासाठी मार्लेश्वराच्या भक्तांनी मोठी गर्दी केली होती. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने प्रतिवर्षी मार्लेश्वराचा वार्षिक यात्रोत्सव होत असतो. यावर्षी दि. ११ ते १७ जानेवारी या कालावधीत हा यात्रोत्सव साजरा होत आहे. मार्लेश्वरचा हा वार्षिक यात्रोत्सव सुप्रसिद्ध आहे. यात्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते तो श्रीदेव मार्लेश्वरं आणि गिरीजादेवीचा विवाहसोहळा. देवाच्या या लग्नाला कल्याणविधी असे म्हणतात. सर्व विधी यथासांग पार पडतात.
देवाला हळद लावली – दि. ११ जानेवारी रोजी आंगवली मठात प्रथेप्रमाणे मार्लेश्वर देवाचा मांडव घालून या यात्रोत्सवाची सुरूवात झाली. दि. १२ जानेवारी रोजी रात्री आंगवली मठात मार्ले श्वर देवाला हळद लावण्यात आली व घाणा भरण्यात आला. दि. १३ जानेवारी रोजी सायंकाळी मठात यात्रा, दिंड्या, कावड, पालख्यांचे आगमन झाले. कल्याणपुर्व विधी व रात्री १२. वा. मार्लेश्वर पालखीचे शिखराकडे प्रस्थान झाले. याअगोदर देवरूखंच्या व्याडेश्वराची पालखी, आंबव व लांजा येथील दिंड्या तर वांझोळेची कावड या सर्वांनी पवईला जाण्यासाठी प्रयाण केले.
वाजतगाजत पालख्या आल्या – पवईतून मार्लेश्वराची पालखी, यजमान व्याडेश्वराची पालखी, दिंड्या व कावड या सर्वांनी शिखराकडे प्रस्थान केले. याअगोदर साखरप्याची गिरिजादेवीची पालखी शिखरावर पोहचली होती. सर्वजण शिखरावर पोहचल्यानंतर मंगळवारी सकाळी मुलगी पाहणे, मुलाचे घर पाहणे, मागणी टाकणे, पसंती करणे, मानपान असे माणसाच्या लग्नात जसे विधी पार पडतात तसेच विधी देवाच्या लग्नात संपन्न झाले. यानंतर मार्लेश्वर-गिरिजादेवीच्या लग्नाचा मुहुर्त काढण्यात आला. विवाह सोहळा रायपाटणकर स्वामी, लांजेकर स्वामी, राजपुरोहित प्रकाश स्वामी, रायगडचे महादेव स्वामी आणि देवरुखचे मठपती यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
३६० मानकऱ्यांना निमंत्रण – त्यांची पाद्यपूजा झाल्यावर त्रिपूर उजळण्यात आला. यानंतर विवाहसोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वी तब्बल ३६० मानकऱ्यांना विवाहाचे अगत्यपुर्वक निमंत्रण देण्यात आले. यानंतर शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करुन, विवाहसोहळ्याला मंत्रघोषात प्रत्यक्षात प्रारंभ करण्यात आला. दुपारी १.१६ वाजण्याच्या मुहुर्तावर मंगलाष्टकांनी विवाहसोहळा संपन्न झाला. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी साक्षात परमेश्वराचा विवाहसोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवला. तर सनई-चौघड्यांचे मंजुळ सूर सह्याद्रीच्या कडेकपारीत पर्वतरांगांमध्ये घमत होते.