महिला व वृद्धांसाठीच्या शासनाच्या विशेष योजनांमुळे एसटीचे भारमान दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळ नवीन तंत्रज्ञान असलेल्या बसेस उपलब्ध करून देत आहे; परंतु दुसरीकडे आयुर्मान संपलेल्या बसचे निर्लेखन (भंगारात) काढल्या जात आहेत. यावर्षी आयुर्मान संपलेल्या ७० बस महामंडळाने भंगारात काढल्या आहेत. या बदल्यात एसटीच्या ताफ्यात लवकरच नवीन १० गाड्या येणार आहेत. गेल्या ५ वर्षांत रत्नागिरी विभागातून एकूण २२९ गाड्या भंगारात दिल्या आहेत. सर्वसामान्यांची लाईफलाईन म्हणून एसटीकडे पाहिले जाते. आता शासनाच्या विविध योजनांमुळे एसटीला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी एसटीचे प्रयत्न आहेत. त्यामुळे दर्जेदार गाड्या ताफ्यात येण्यासाठी आयुर्मान संपलेल्या गाड्या दरवर्षी भंगारात काढल्या जातात.
एसटी बसचे आयुर्मान १५ वर्षे निश्चित केले आहे. १५ वर्षांनंतर बस वापरातून बाजूला काढल्या जातात. तत्पूर्वी गाड्यांचे सुस्थितीत असलेले स्पेअरपार्ट काढून ठेवले जातात. महामंडळाच्या रत्नागिरी विभागातून दरवर्षी बसेसचे निर्लेखन करण्यात येते; मात्र २०२२-२३ मध्ये एकही बस निर्लेखित करण्यात आलेली नाही. आयुर्मान संपलेल्या बस वापरातून बाजूला काढल्या जात असतानाच नवीन बसची मागणी करण्यात येते. त्यामुळे, बसची संख्या कमी होत असतानाच ताफ्यात नवीन बसची भर पडते. रत्नागिरी विभागात येत्या काही दिवसांत नवीन दहा गाड्या उपलब्ध होणार आहेत. गाड्या भंगारात काढल्यानंतर त्याचे चांगले पार्ट काढून घेतले जातात. उर्वरित बसचा लिलाव केला जातो. येत्या दोन महिन्यांमध्ये म्हणजेच फेब्रुवारी/ मार्चमध्ये आणखी १४ गाड्यांचे निर्लेखन केले जाणार आहे.