रत्नागिरी तालुक्यातील गोळप-डोंगरेवाडी येथील वसंत महेश्वर बापट (वय ५८) यांच्या गुरांच्या गोठ्याला शॉर्टसर्किटने आग लागल्याने गोठ्यात बांधलेली ११ गुरे जागीच दगावली असून, तीन जनावरे गंभीररीत्या भाजली आहेत. सहा जनावरांना वाचविण्यास यश मिळाले आहे. त्यामुळे गोठा, गवत आणि गुरांसहित सुमारे १२ लाख ५९ हजारांचे नुकसान झाले. बापट यांच्या घराजवळच अनेक वर्षे गुरांचा गोठा असून, त्यामध्ये गायी-वासरे, म्हशी व रेडा अशी २० जनावरे होती. १७ एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर विद्युतपुरवठा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज आहे. गोठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाताचा पेंढा व गवत असल्यामुळे आग भडकली. पोलिस ठाण्यामध्ये फोन केल्यानंतर फिनोलेक्स कंपनीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांना थोडे यश आले; मात्र ११ जनावरांचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर तीन जनावरे गंभीररीत्या जखमी झाली. सहा जनावरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळाले. त्यातही काही जणांना इजा झाली आहे. तीन जनावरे बाहेर काढली होती; पण ती पुन्हा आत गेल्यामुळे त्यांच्चा जळून मृत्यू झाला. गवत आणि पेंढ्यांमुळे सकाळपर्यंत आग धुमसत होती,
सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी पोद्दार व कशालकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. त्यामध्ये गोठ्याचे सुमारे सात लाख ५० हजार रुपयाचे नुकसान झाले, तर भाताचा पेंढा व साठवण केलेले गवत याचे सुमारे ८० हजारांचे नुकसान, पशुखाद्यांचे २५ हजारांचे आणि मृत्युमुखी पडलेल्या ११ जनावरांमुळे ४ लाख ४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच ते सहा जनावरे गाभण होती. तीन जनावरे भाजलेल्या अवस्थेमध्ये असून, त्यांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेल्या सहा जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे विच्छेदन केले.
नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदतीसाठी प्रयत्न – घटनास्थळी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे अंमलदार, ग्रामविकास अधिकारी, पोलिसपाटील व तलाठी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. भाजपचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष दादा दळवी, नाना शिंदे, सुशांत पाटकर, अजय पानगले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी नैसर्गिक आपत्ती कार्यक्रमांतर्गत मदत मिळवण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे बापट यांना आश्वासन देण्यात आले.