सर्वत्र शुक्रवारपासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. चाकरमान्यांची पाऊले गावाकडे वळू लागली आहेत. गणेशोत्सवामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा दिसून यायला लागल्या आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावाकडे येत असल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी देखील होत आहे. महामार्गतील खड्डे, त्यात सतत सुरु असलेला पाऊस, आणि त्यात कोरोनाचे संकट. या सर्व संकटांशी दोन हाथ करत चाकरमानी गावाकडे सरकू लागले आहेत. दोन दिवसांपासून महामार्गावर वाहनांची वर्दळ भरपूर प्रमाणात वाढली आहे.
बाप्पाच्या स्वागतासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे, एसटी महामंडळाने गणपती स्पेशल जादा गाड्या सोडल्या असून या गाड्यांना प्रतिसाद सुद्धा उत्तम मिळत आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी काल कोकणच्या दिशेने रवाना होणार्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सर्व गाड्या मार्गस्थ झाल्या. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक चन्ने यांसह, संबंधित विविध अधिकारी उपस्थित होते.
चाकरमान्यांचा उत्साह प्रवासाच्या सुरुवातीपासूनच उदंड आहे. कोकणच्या दिशेने या गाड्या मार्गस्थ होताच गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला गेला. कोकणसह अवघ्या महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. ॲड. परब यांनी कोरोनाच्या संकटाचे विघ्न लवकरात लवकर नष्ट होऊ दे आणि एसटीला पूर्वीसारखे सुगीचे दिवस पहायला मिळू दे, असे गणरायाला साकडे घालत चाकरमान्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
कोकणातील महत्वाचा सण म्हणून गणेशोत्सव हा ओळखला जातो. गणपती व चाकरमान्यांचे एक वेगळेच नातेसंबंध गुंतलेले आहे. एसटी महामंडळ दरवर्षी कोकणातील गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जादाच्या गाड्या सोडल्या जातात. यंदाही महामंडळाने गणेशोत्सवासाठी २२०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलेला. पाऊस, पाण्याचा धोका लक्षात घेऊन सुरक्षित प्रवास म्हणून चाकरमान्यांनी एसटीच्या जादा सोडण्यात येणाऱ्या गाड्यांना पसंती दिल्याने, काही दिवसांमध्येच एस.टीच्या गाड्या फूल झाल्या. दरवर्षी कोकणात ठाणे, मुंबई, विरार, वसई, पालघर आणि आसपासच्या परिसरातील लाखोंच्या संख्येने चाकरमानी दाखल होतात.