जिल्ह्यात भारत दूरसंचार निगम लि. (बीएएनएलची) सेवा म्हणजे एखाद्या रुग्णाचे सर्व अवयव निकामी होऊन ती व्हेंटिलेटरवर गेल्यासारखी आहे. जिल्ह्यातील १०६ टॉवरपैकी बीएसएनएलचे ४८ टॉवर बंद आहेत. काही ठिकाणी बॅटरी नाही, महावितरणची जोडणी नाही, जनरेटरला डिझेल, नाही, सोलर पॅनल नाही, बील न भरल्याने विद्युत पुरवठा बंद आहे. अशी वाईट अवस्था आहे. यावर कंपनीकडे काहीच उपाययोजना नाहीत. यात सुधारणा न झाल्यास मुंबई ऑफिसवर मोर्चा काढू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला. उबाठाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी बीएसएनएलच्या खराब सेवेचा जाब विचारण्यासाठी येथील मुख्यप्रबंधक कार्यालयावर धडकले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, रत्नागिरी तालुका प्रमुख शेखर घोसाळे, संजय पुनसकर, देसाई आदी उपस्थित होते. मुख्य प्रबंधक सौः अमृता लेले, बोंगले, शिरसाट आदी बीएसएनएलचे अधिकारी उपस्थित होते.
माजी खासदार राऊत यांनी रत्नागिरी, लांजा, राजापूर देवरुख आदी भागातील बीएसएनएलच्या कोलमडलेल्या सेवेबाबत विचारणा केली. प्रत्येक टॉवरनिहाय सेवेचा – आढावा घेतला. रत्नागिरीमध्येच स्टेट बँक कॉलनी, मिऱ्या, झाडगाव, आदी भागामध्ये बीएसएनएलची रेंज येत नाही. कॉल एकमार्गी होणे, ऐकायला न जाने, अशा तक्रारी केल्या. तुम्ही सेवेत सुधारणा करणार नसाल तर आम्ही कार्ड बदलू, असा इशाराही देण्यात आला. याबाबत वर्षानुवर्षे तक्रारी केल्या जात आहेत. परंतु तक्रारी करूनही सुधारणा नाही. फोन केला तर कर्मचारी अरेरावीची भाषा करत आहेत, हे योग्य नाही असे सांगण्यात आले. याबाबत मुख्य प्रबंधक अमृता लेले यांनी तक्रारीबाबत संपूर्ण माहिती लिहुन घेतली आणि त्या लवकरात लवकर सोडवू, असे आश्वासन दिले. तसेच अपशब्द न वापरता चर्चा करू, असेही स्पष्ट केले.
बीएसएनएलच्या खराब सेवेबाबत दिवसाला ३० तक्रारी येतात आणि त्या आम्ही ३ दिवसांमध्ये सोडवतो, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मग सेवेबाबत दीड वर्षे आमच्या तक्रारी आहे, त्या तुम्ही का सोडवल्या नाहीत, असा सवाल शिवसैनिकांनी केला. त्यावर कंपनीकडे ठोस उत्तर नव्हते. लांजा, भांबेड, हरचिरी, गणेशगुळे, फणसवळे, दांडेआडोम, वडिलिंबू, चांदोरचा टॉवर आदीबाबत तक्रारी मांडल्या. परंतु कंपनीकडुन थातुरमातुर उत्तरे मिळाली. शिवसैनिकांच्या प्रश्नाचे समाधान करु शकले नाही. पुढच्या महिन्यात पुन्हा आढावा घेऊ तेव्हा ठोस उत्तरे द्या अन्यथा आम्हांला वेगळ्या भाषेत सांगावे लागले, असा इशाराही राऊत यांनी दिला.
सेवेसाठी ५ जी मोबाईल आवश्यक लांजा, राजापुर येथील ११ टॉवरना रेंज नाही, अशाही तक्रारी आहेत. परंतु बीएसएनएल हे मान्य करायला तयार नाही. बीएसएनएलच्या आता २ जी सेवेऐवजी ४ जी सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे ५ जी मोबाईल असल्याशिवाय रेंज मिळणार नाही. अनेक ग्राहकांचे जुने मोबाईल संच आहेत. ते बदलण्याची गरज आहे. परंतु याबाबत ग्राहकांना सांगूनही तांत्रिक बाब लक्षात घेत नाही, असा दावा बीएसएनएल कंपनीने केला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार निद्रीस्त – बीएसएनएल कंपनी केंद्र शासनाच्या अखत्यारित येते. त्यामुळे खासदारांनी या सेवेबाबत आढावा घेणे आवश्यक आहे. दर ३ महिन्यांनी आढावा बैठक घेतली जाते. परंतु आपले खासदार निद्रीस्त आहेत. त्यामुळे वर्ष झाले, एकही बैठक झालेली नाही. त्यांना जनतेच्या प्रश्नाशी काही घेणे देणे नाही, खासदार निद्रीस्त मिळाल्याने टॉवर व्हेंटिलेटरवर गेले, असा टोला माजी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.