गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरु आहेत. आदित्य आणि राज ठाकरे यांनी देखील याबद्दल सकारात्मक विधानं केली आहेत. या पार्श्वभूमीवर एका पक्षप्रवेश कार्यक्रम ानंतर मातोश्रीवर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरेंनी युतीबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.
थेट बातमीच देईन ! – या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चाबद्दल उद्धव यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर महाराष्ट्राच्या मनात जे आहे, ते होईल, अस सूचक विधान ठाकरेंनी केलं. तुम्ही याबद्दल दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय संदेश देऊ इच्छिता, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर संदेश कशाला, मी थेट बातमीच देईन, असं म्हणत उद्धव यांनी राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले.
राज ठाकरेंची मुलाखत – उद्धव आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन होणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून याबद्दलच्या चर्चा सुरु आहेत. ‘आमच्या मतभेदांपेक्षा, वादापेक्षा महाराष्ट्र मोठा नाही’ असं राज ठाकरे एप्रिलच्या अखेरीस दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले होते. त्यावर ‘आमच्यात वाद, भांडणं नव्हतीच. जर असलीच, तर ती आज संपली’ असं म्हणत उद्धव यांनी राज ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यानंतर शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या मनोमिलनाच्या चर्चेनं जोर धरला.
महाराष्ट्राच्या मनात आहे तेच….. – एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही महिन्यांपूर्वीच प्रवेश केलेल्या महिला पदाधिकारी सुजाता शिंगाडे शुक्रवारी स्वगृही परतल्या. उद्धव ठाकरेंनी त्यांचं पक्षात पुन्हा स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरेंना मनसेसोबतच्या युतीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर ‘महाराष्ट्राच्या मनात जे आहे, ते होईल’ असं सूचक उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं. तुम्ही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय संदेश देऊ इच्छिता, असा प्रश्न विचारला असता, संदेश कशाला, तुम्हाला थेट बातमीच देईन, असं उद्धव ठाकरे अतिशय आत्म विश्वासानं म्हणाले. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या शक्यतेला आणखी बळ मिळालं आहे.
कोणताही संभ्रम नाही – ‘माझ्या मनात, शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या मनात कोणताच संभ्रम नाही. त्यामुळे मी आता संदेश देणार नाही, बातमीच देईन,’ अशा मोजक्या शब्दांत उद्धव यांनी मनसेसोबतच्या संभाव्य युतीच्या चर्चावर भाष्य केलं. गेल्या दोन दिवसांत शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या युतीबद्दल आदित्य आणि अमित ठाकरे यांनी देखील सकारात्मक विधानं केली आहेत. त्यामुळे दोन बंधूंमधील दुरावा मिटण्याची शक्यता वाढली आहे.