राज्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा राज्याच्या हवामान विभागाने दिला आहे. ‘त्यामुळे कोकणासह रत्नागिरीत कोणत्याही वेळी आपत्कालीन स्थिती उद्भवू शकते. असे असताना रत्नागिरीतील नाचणे येथील भारतीय हवामान शास्त्र विभागाला कुलूप लावण्यात आले आहे. लाखो रुपये खर्च करून येथे यंत्रसामुग्री उभारण्यात आली आहे. मात्र हे कार्यालय बंद आहे. भारत सरकारच्या हवामान खात्यांतर्गत भारतीय हवामान शास्त्र विभाग रत्नागिरीतील नाचणे येथे कार्यरत आहेत. कार्यालयाच्या इमारतीच्या बाजुला स्वयंचलित मौसम स्टेशन कार्यान्वित आहे. तर हवामानाची स्थिती दर्शवणारी यंत्रणा इमारतीच्या टेरेसवर बसविण्यात आली आहे.
हवामानाच्या बदलत्या नोंदी ठेवण्यासाठी रत्नागिरीत या विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी एक अधिकारी व सात ते आठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मुंबईतील कुलाबा येथील हवामान केंद्राच्या अखत्यारीत या केंद्राचे कामकाज चालते. परंतु सद्यस्थितीत रत्नागिरीतील हवामान केंद्राला कोणीच वाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वादळी पावसाचा इशारा व आठवड्याच्या कामकाजाचा पहिलाच दिवस असलेल्या सोमवारी दुपारी १ वाजता हवामान केंद्राला कुलूप ठोकून सारी मंडळी गायब झाल्याची संतप्त चर्चा रत्नागिरीत सुरू होती. हवामान केंद्राच्या आवारातच अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. तरीही कार्यालयाला कुलूप ठोकून सर्वचजण गायब असल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे.
शासकीय कार्यालयीन काम काजाच्या वेळेत जेवणासाठी केवळ अर्धा तास देण्यात आला आहे तर कार्यालय पूर्ण बंद न ठेवता दुपारी दोन ते अडीच या वेळेत टप्प्याटप्प्यात जेवण करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. असे असताना ७ते ८ कर्मचारी असलेल्या हवामान केंद्राला दुपारी १ वाजण्यापूर्वीच कुलूप लावण्यात आले होते. यावेळी येथे आलेल्या एका कर्मचाऱ्याने जेवणासाठी गेलो होतो, आम्हाला निवासस्थाने कशाला दिलीत? असा थेट प्रश्न सरकारलाच विचारला आहे. त्याचे उत्तर आता हवामान विभागालाच द्यावे लागणार आहे.