कोसळणाऱ्या धबधब्यांवर वीजनिर्मिती केली जाणार असून त्याचा पहिला प्रयोग चिपळुणातील कोळकेवाडीमध्ये होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात लक्षणीय प्रगती होईल आणि सर्वसामान्यांना मुबलक वीज मिळेल, असे मानले जात आहे. वीजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांचा उपयोग करून घेण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक असे वीजप्रकल्प हाती घेण्याचे धोरण आखले जात आहे. त्यासाठी पावसाळ्यात पश्चिम घाट क्षेत्रातील अनेक छोट्या-मोठ्या धबधब्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यावर हंगामी काळासाठी वीजनिर्मिती होऊ शकते. धबधब्यांवरून कोसळणाऱ्या पाण्याची उंची आणि वेगाचा योग्य वापर करून वीजनिर्मिती देशभरात शक्य आहे. अशा प्रकारच्या लघु जलविद्युत प्रकल्पात नैसर्गिक धबधब्यांच्या पाण्याचा उपयोग करून, टर्बाईन चालवून त्यातून वीज निर्माण करता येईल. धबधब्यांतून वीज निर्माण करणे, हा स्वस्त ऊर्जेचा स्रोत ठरू शकतो.
किती उंची आवश्यक ? – सामान्यतः अशा प्रकल्पासाठी १० मीटर किंवा त्यापेक्षा अधिक उंचीचा धबधबा उपयुक्त असतो. उंची जितकी अधिक, तितकी पाण्याची गती आणि दाब जास्त आणि त्यातून मिळणारी ऊर्जा अधिक. मात्र, अगदी ५ मीटर उंचीवरही, योग्य तांत्रिक नियोजनासह लंहान प्रकल्प उभारता येतो.
खर्च किती येतो? – साधारणतः २ हजार वॅट क्षमतेच्या यंत्रासाठी फक्त चार ते पाच लाख खर्च येतो. धबधब्यावरील प्रकल्प किती मोठा, यावर खर्च वाढू शकतो. तसेच बांधकामासाठी वेगळा खर्च येतो. असा प्रकल्प्त वर्षातून पावसाळ्यात पाच ते सहा महिने सुरू राहू शकतो. टर्बाईन व इतर यंत्रणा यांची नीट देखभाल केल्यास तो वर्षानुवर्षे कार्यरत राहत असल्याची माहिती महाजनकोकडून देण्यात आली.
चिपळूणच्या कोळकेवाडीत प्रयोग ? – १५ ते २० मीटर उंचीवरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून सहज वीज निर्माण करण्याचा प्रयोग चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडीत केला जात आहे. मात्र याबाबतचा अधिक तपशील मिळू शकलेला नाही.