दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. खडपोली नदीवरील पूल खचल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. केवळ हलक्या वाहनांसाठी पेढांबेचा पूल खुला ठेवण्यात आला आहे. २० वर्षांपासून या पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी मिळालेला नाही. त्यामुळे धोकादायक परिस्थितीतून ग्रामस्थ या पुलावरून प्रवास करत आहेत. पिंपळी-नांदिवसे मार्गावरील खडपोलीच्या स्थानिक नदीवरचा पूल गेल्या आठवड्यात खचला. त्यानंतर या पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे दसपटी भागाकडे जाणारे प्रवासी ३.४ किमीचा लांब प्रवास करून खडपोलीमार्गे दसपटीकडे जात आहेत. दसपटीकडे जाण्यासाठी त्यांना पेढांबे पुलावरून जावे लागत आहे. हा पुल अरुंद आहे. त्याचे बांधकाम ६५ वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. मागील अनेक वर्षापासून या पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे; मात्र, शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे या पुलाची दुरुस्ती रखडली. सध्या या पुलावर प्रचंड खड्डे पडले आहेत. सह्याद्रीच्या खोऱ्यातून येणारे पावसाचे पाणी या पुलाखालून चिपळूणकडे जाते.
अतिवृष्टीच्या काळात या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी असते. आतापर्यंत आलेले अनेक महापूर या पुलाने पाहिले आहेत. जुलै २००५ मध्ये चिपळूणमध्ये महापूर आला तेव्हापासून हा पूल धोकादायक झाला असून, पुलाच्या दुरुस्तीची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत; मात्र आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या या पुलावरून जातात. खासगी वाहतुकीसह पेढांबे, सोसायटी, नागावे, भराडे, अलोरे, कोळकेवाडी, कुंभार्लीकडे जाणारी वाहने याच पुलावरून ये-जा करत असतात. हा पूल वाहतुकीसाठी बंद झाला तर या भागातील नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. खडपोली नदीवर ६० वर्षापूर्वी बांधलेला पूल खचल्यानंतर खडपोलीमार्गे दसपटीकडे जाणारी वाहतूक या पुलामार्गे वळवण्यात आली आहे. खडपोलीमध्ये एमआयडीसी आहे. या एमआयडीसीमधून दिवसाला २५ ते ३० वाहने माल वाहतूक करतात. पेढांबेतील पूल धोकादायक असल्यामुळे अवजड वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नाही.

