तालुक्यातील मिरजोळेवासीयांनी कुवारबाव महावितरणवर धडक दिली. महावितरणने कोणतीही पूर्वकल्पना न देता जबरदस्तीने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवले. यामुळे सर्वांची बिले वाढली आहेत. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करता आले नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आणि नवीन वीजमीटर बदलल्याशिवाय कोणीही ग्रामस्थ वीजबिल भरणार नाही, अशा इशारा महावितरणला दिला. जुने सुस्थितीत चालणारे मीटर अचानक महावितरणने बदलले. काही लोकांनी त्याला विरोध केला; पण तो झुगारून धाक देऊन मीटर बदलण्यात आले. याबाबत मिरजोळे ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये विषय मांडला. प्रत्येकाची रीतसर वीजबिले तपासून ग्रामपंचायतीमार्फत कुवारबाव महावितरण कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आली. वीजबिल कमी करून जुने मीटर परत बसवण्यासाठी सांगण्यात आले.
या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. या विरोधात मिरजोळे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आणि १२ वाजता सर्व ग्रामस्थ महावितरणच्या कार्यालयात धडकले; मात्र महावितरण अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या शंकेचे निरसन करता आले नाही. या वेळी वैभव पाटील, सरपंच रत्नदीप पाटील, गजानन गुरव, शुभानंद पाटील, राहुल पवार, संदेश वाडकर, रजनीकांत पंडये, किशोर जोशी, राजा मयेकर, सुनील कळंबटे, दत्ताराम गुरव आदी ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी नवीन वीजमीटर बदलल्याशिवाय कोणीही ग्रामस्थ वीजबिल भरणार नाही, असे महावितरण अधिकाऱ्यांना ठणकावले.

