अथांग समुद्र, किनाऱ्यावरील वाळूवरील खेळ, समुद्राच्या लाटा त्या अंगावर घेत केली जाणारी मौजमजा, शिवाय वॉटर स्पोर्ट्स, झीपलाईन, पॅरासेलिंग, स्कूबा ड्रायव्हिंगमुळे पर्यटकांची पावले रत्नागिरी जिल्ह्याकडे वळत आहेत. गणपतीपुळे, मालगुंड, वरवडे, काजिरभाटी, आरे-वारे, मांडवी, भाट्ये, झरीविनायक, पूर्णगड गणेशगुळे, गावखडी यासह वेळणेश्वर, कशेळी, वेळास, कर्धे, हर्णे, मुरुडचे किनारे पर्यटकांची गर्दी खेचत आहेत. श्रीक्षेत्र गणपतीपुळे, पावस येथील स्वामी स्वरूपानंद मंदिर, गणेशगुळेचे गणपती मंदिर ही प्रमुख देवस्थाने असून, या ठिकाणी भक्तांची गर्दी होते. त्याच बरोबर समुद्रकिनाऱ्याचे पर्यटकांना विशेष आकर्षण असल्यामुळे भाविक धार्मिक स्थळांना भेटी देण्याच्या निमित्ताने आजूबाजूच्या समुद्रकिनाऱ्यावर गर्दी करत असतात. समुद्रस्नान हा आवडीचा भाग. याच्या जोडीला किनाऱ्यावर कुटुंबातील सदस्यांबरोबर खेळ रंगतात. त्याचबरोबर वॉटर स्पोर्ट्स, झीपलाईन, पॅरासेलिंग, स्कूबा ड्रायव्हिंगचाही आस्वाद पर्यटक घेतात.
पर्यटकांची वॉटर स्पोट्र्साठी पसंती मिळत आहे. समुद्रकिनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटा अंगावर घेत समुद्रस्नानाचा आनंद घेतला जातो. पर्यटकांसाठी जलक्रीडांचे विविध प्रकार उपलब्ध असून, पर्यटक याचा आस्वाद घेतात. वॉटर स्पोर्ट्सबरोबर स्कूबा ड्रायव्हिंगमध्ये समुद्राच्या अंतर्भागाचे सौंदर्य पाहता येते. पॅरासेलिंग, झीपलाईन मात्र धाडसी पर्यटक करू शकतात. मात्र, ते पाहण्यासाठीही पर्यटकांची गर्दी होत असते. रत्नागिरी तालुक्यात गणपतीपुळे, मांडवी, भाट्ये किनाऱ्यावर प्रचंड गर्दी असते. हल्ली आरेवारे, काजिरभाटी बिचेसवरही गर्दी वाढू लागली आहे. गर्दीमध्ये जाण्याचा कंटाळा करणाऱ्या पर्यटकांची पावले पूर्णगड, गणेशगुळे, गावखडी समुद्राकडे वळू लागली आहे. पर्यटकांसह स्थानिकही वनडे पिकनिकसाठी या ठिकाणांची निवड करत आहेत. सुटी तसेच वीकेंडला या बिचेसवरही गजबज अधिक असते.
जिल्ह्यात पर्यटनासाठी येणारा पर्यटक केवळ एक ठिकाण किंवा एका मंदिरात दर्शन घेत माघारी फिरत नाहीत. आसपासची मंदिरे, किनारे एकूणच प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या जातात. हल्ली समुद्रकिनाऱ्यांवर खाद्यपदार्थ विक्री, खेळणी विक्री, शहाळी विक्री, अंघोळीसाठी पाणी या व्यवसायांना सुगीचे दिवस आले आहेत. वास्तविक, संबंधित गावांतील स्थानिक स्वराज्य संस्थांनी पर्यटकांसाठी प्रशासनगृहे, विजेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था किनाऱ्यांवर उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांचे दुर्लक्ष होत आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या लगतच्या जिल्ह्यांतून अनेक पर्यटक एक दिवसाच्या सहलीसाठी तालुक्यात येतात. एक दिवसाच्या सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

