कोयना प्रकल्पाच्या पोफळीतील बोगद्याला गळती लागली आहे. त्याचा परिणाम प्रकल्पाच्या वीज निर्मितीवर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पोफळीतील बोगद्याला अधिक गळती लागल्याचा परिणाम प्रकल्पाच्या वीज निर्मितीवर होऊन गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १४९.६२९ दशलक्ष युनिट वीज निर्मिती कमी झाली आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पोफळी येथील टप्पा-१ आणि २ च्या आपत्कालीन बोगद्याला व सर्ज टँकला गळती लागली आहे. ती दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून दोन टप्पे बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याच्या एकूण वीज निर्मितीच्या उत्पादनात ६०० मेगावॅट वीज निर्मिती तात्पुरती बंद झाली आहे. कोयनेसह महाराष्ट्रात यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी असला तरी सद्यःस्थितीत धरणात मुबलक पाणी आहे; मात्र त्यानंतरही मागील आठ महिन्यांत तब्बल १४९.६२९ दशलक्ष युनिट वीज कमी निर्माण झाली आहे.
या जलवर्षात पश्चिमेकडे २४.३३ टीएमसी पाण्यावर ११४९.०३३ दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली, तर गतवर्षी २९.२५ टीएमसी पाण्यावर १३४८.४९१ दशलक्ष युनिट निर्मिती झाली होती. त्यामुळे पश्चिमेकडे ४.४३ टीएमसी पाणी वापर कमी झाल्याने मोठी वीज तूट निर्माण झाली. सिंचन व पूरनियंत्रणासाठी २७.४६ टीएमसी पाण्यावर १३३.८७४ दशलक्ष युनिट वीज तयार झाली असून, गतवर्षर्षीपेक्षा ४९.८२९ दशलक्ष युनिट वाढ नोंद झाली आहे. चारही जलविद्युत प्रकल्पांचा एकत्रित विचार करता वीज निर्मिती कमी झाल्याने झालेली तूट भरून काढण्याचे नियोजन भविष्यात करावे लागणार आहे. कोयना धरणात मुबलक पाणी आहे. राज्यात सर्वाधिक विजेची मागणी उन्हाळ्यात असते. त्या काळात या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करून वीज निर्मिती करणे शक्य होणार आहे. तसे झाल्यास उन्हाळ्यात खासगी कंपन्यांकडून जास्त दराने वीज विकत घेण्याची वेळ महानिर्मिती कंपनीवर येणार नाही. पोफळीतील ईव्हीटी येथे जलसंपदा विभागाकडून बोगद्यातील गळती काढण्याचे काम केले जात आहे. जलसंपदा विभाग आणि महानिर्मिती कंपनीचे अधिकारी या ठिकाणी कामाची पाहणी करून काम कधीपर्यंत पूर्ण होईल, त्याचा आढावा घेत आहेत.

