पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने पक्ष उभा करणार असे सांगत आगामी निवडणुकीत शिवसेनेचीच ताकद दिसेल असे प्रतिपादन शिवसेना नेते आ.भास्कर जाधव यांनी केले. पक्षाच्या मेळाव्यात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. शहरातील बांदल हायस्कूलच्या सभागृहात ठाकरे सेनेच्या विजयी आणि विजयासाठी लढलेल्या गुहागर व चिपळूण मतदार संघातील सर्व उमेदवारांचा सत्कार आमदार जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत ठाकरेसेनेकडून सामान्य, उच्चशिक्षीत आणि सर्व जाती धर्मातील उमेदवारांना स्थान दिले. या उमेदवारांनी विजयासाठी निकराने झुंज दिली. यात काही यशस्वी ठरले तर काहींना अपयश आले. या निवडणुकीत युतीच्यावतीने पैशाचा पाऊस पाडल्याचा आरोप करत त्यामुळे ठाकरेसेनेला मोठा पल्ला गाठता आला नाही असा दावा त्यांनी केला.
तरीही आपण लढलो. ठाकरे सेनेचे अनेक उमेदवार कमी मतांनी पराभूत झाले. गेल्या १८ वर्षाच्या कालखंडात पराभूत झालेल्या अनेक कार्यकर्त्यांना पुन्हा निवडून आणलेले आहे. जे सहकारी सोडून गेले, त्यांनी म ाझ्यावर कधी टीका केली नाही. मात्र या निवडणुकीत अपेक्षीत यश मिळाले नाही म्हणून मी खचून जाणारा नेता नाही. या निवडणुकीने आत्मचिंतन करण्याची वेळ पक्ष प्रमुख, नेते आणि पदाधिकाऱ्यांवर आली आहे. आजपर्यतची वाटचाल संघर्षातून उभी राहिली आहे. यापुढेही उभारी घेण्यासाठी संघर्ष करूयात असे आवाहन आ. भास्कर जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात शिवसैनिकांना केले.
अंजनवेल गयतून विजयी झालेले जि.प. चे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव म्हणाले, विजयी उमेदवारांचा सत्कार होण स्वाभाविक आहे. परंतू ज्या सामान्य कार्यकर्त्यांनी निकराने लढा दिला. त्यांचा सन्मान करण्यासाठी मेळावा घेण्यात आला. संतोष थेराडे, संतोष चव्हाण, माजी सभापती शिंदे, सौ. नेहा माने, सुभाष जाधव यांच्यासह विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करत निवडणुकीतील किस्से सांगितले. त्यांनी यापुढेही आमदार जाधवांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.

