रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचे प्रमाण प्रचंड वाढले होते. तेंव्हापासूनच लसीकरण जास्तीत जास्त वेगाने करण्याकडे आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित केले होते. गावोगावी जाऊन सुद्धा मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले होते. त्यामुळे सध्या रत्नागिरीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. जी कोरोना संक्रमितांची दररोजची संख्या ५०० आणि ६०० च्या दरम्यान असायची ती आत्ता घटून, ५० आली आहे. हि नक्कीच जिल्ह्यासाठी दिलासाजनक बाब आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बाबतीत रत्नागिरी जिल्ह्याने सोमवारी दहा लाखाचा टप्पा पार केला असून त्यामध्ये ६ लाख ९८ हजार ९९५ नागरिकांनी पहिला डोस तर ३ लाख ३ हजार ९२२ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. जानेवारी २०२१ पासून कोविड लसीकरणाला प्रारंभ झाला. सुरूवातीला लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आणि ऑनलाईन नंबर लावण्याच्या कामामुळे लसीकरणाची गती मंदावत होती. मात्र,ऑगस्ट महिन्यापासून अधिक प्रमाणात लस उपलब्ध झाल्याने लसीकरणाचा वेग देखील वाढला आहे.
सोमवारी लसीकरणाचा दहा लाखाचा टप्पा पार करण्यात आला. लसीकरणामध्ये कोविशिल्डचा पहिला डोस ५ लाख ७७ हज़ार ४६३ नागरिकांनी घेतला असून, दुसरा डोस २ लाख १९ हजार ९७७ नागरिकांनी घेतला आहे. तर दुसरी उपलब्ध असलेली लस कोवॅक्सिन, तिचा पहिला डोस १ लाख २१ हजार ५३२ नागरिकांनी घेतला असून, दुसरा डोस ८३ हजार ९४८ नागरिकांनी घेतला आहे. यामध्ये सर्व वयोगटाचा समावेश असून, सामान्य नागरिकांपासून ते फ्रंटलाईन वर्कर, इतर कर्मचारी इत्यादी नागरिकांचा समावेश आहे.