बँक ऑफ इंडिया शाखा वैभववाडीच्या एटीएम मध्ये कॅश डिपॉझिट करणारे सेक्युअर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड कंपनीचे कर्मचारी विठ्ठल खरात, संदेश कारीवडेकर हे मोटरसायकल वरून २३ लाख रुपये घेऊन कणकवलीहुन वैभववाडीच्या दिशेने निघाले होते. परंतु, रस्त्यातच अज्ञात चोरट्याने २३ लाख रुपयाची रक्कम लुटून तिथून पळ काढला आहे. ही घटना तळेरे-वैभववाडी मार्गावर घडली असून, या आकस्मित घडलेल्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
कणकवलीच्या बँक ऑफ इंडियामधून ३० लाखाची रोकड खरात व कारीवडेकर यांनी घेतली व त्यातील ७ लाख रुपये कणकवलीच्या बँक ऑफ इंडिया च्या एटीएम मध्ये डिपॉझिट केले. त्यानंतर उर्वरीत २३ लाख रुपये वैभववाडी येथील एटीएम मध्ये भरणा करण्यासाठी दोघे मोटरसायकलने जात होते. कोकीसरे घंगाळेवाडी दरम्यान मागून मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी खरात व कारीवडेकर यांच्या मोटारसायकलवर जोरात लाथ मारली. ते पडले असता, दोघांच्याही डोळ्यांमध्ये मिरची पावडर फेकली. कर्मचारी डोळे चोळत बसल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील रोख २३ लाख रुपये घेऊन तळेरेच्या दिशेने पलायन केले.
अचानक घडून आलेल्या या घटनेने हे दोन्ही कर्मचारी सुद्धा भांबावून गेले आहेत. जवळील २३ लाखाची एटीएममध्ये भरायचे पैसे देखील चोरट्यांनी लांबवल्याने धक्क्यातून हे दोघे अजून सावरलेले नाहीत. याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. हा प्रकार काल दुपारी घडला असून, अधिक तपास पोलिस करत असून, सर्वत्र आरोपींचा शोध घेतला जात आहे.