कोरोना सुरु झाल्यापासून साधारण दीड वर्ष पूर्ण होत आहे. या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोनाचा संसर्ग पाहत रेल्वे मंत्रालयाने नियमित मेल आणि एक्सप्रेस ट्रेन्स या विशेष गाड्या म्हणून चालवल्या होत्या. मात्र आता या ट्रेन्सच्या वाहतूक आणि भाडे दर पुन्हा सामान्य करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
रेल्वे मंत्रालयाने एका पत्रकाद्वारे ही माहिती स्पष्ट केली आहे. एक्सप्रेस स्पेशल आणि हॉलिडे स्पेशल ट्रेनची सेवा आता नेहमीच्या गाड्यांप्रमाणेच होणार असून, या गाड्या पुन्हा नियमित क्रमांकाने धावणार आहेत. त्यामुळे विशेष ट्रेनसाठी आकारले जाणारे भाडेही आता प्रवाशांना द्यावे लागणार नाही आहे. आता या ट्रेनसाठी प्रवाशांना कोरोना पूर्वीचे जुने नियमित भाडे लागू होणार आहे. सध्या स्पेशल ट्रेनमध्ये नेहमीपेक्षा ३० टक्के जास्त भाडे आकारले जात आहे.
रेल्वे शासनाने घेतलेल्या या निर्णयाबाबत, येत्या काही दिवसांत अंमलबजावणी करण्यात येईल. या निर्णयानंतर १७०० हून अधिक गाड्या नियमित गाड्यांप्रमाणे पूर्ववत केल्या जाणार आहेत. परंतु, भाडेवाढ नसली तरी, मात्र कोरोनाशी संबंधित खबरदारी आणि निर्बंध सर्व गाड्यांमध्ये लागू असतील असेही सांगण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे, काही ट्रेन्सचे आगाऊ बुकिंग सुद्धा करण्यात आले होते. त्यांना सुद्धा एका परिपत्रकाद्वारे रेल्वे प्रशासनाने उत्तर दिले आहे. असे बुकिंग करणाऱ्यांना रेल्वे तिकिटांचे कोणतेही अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही आणि कोणतेही पैसे परत केले जाणार नाहीत, असेही म्हटले आहे. विशेष आकारण्यात येणारे भाडे जरी रद्द केले जात असले, तरी ट्रेनचे भाडे कोरोनापूर्वी होते तेच राहणार आहे. त्याचप्रमाणे, ब्लँकेट उशी सवलत आणि पॅन्ट्रीची सुविधा पूर्वीप्रमाणेच दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.