हवामान विभागाने कोकण आणि परिसरामध्ये पुढील ४-५ दिवस पावसाचे वातावरण राहणार असून, काही ठिकाणी विजेचा कडकडाट होऊन पाऊस पडणार असल्याचे भाकीत केले होते. मागील दोन दिवस दुपारच्या सुमारास अचानक दमदार पावसाने हजेरी लावल्याने, सामन्य नागरिकांपासून, व्यापारी , लहान मोठे विक्रीदार यांचे चांगलेच धाबे दणाणले.
रत्नागिरी शहरामध्ये दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला, पाऊस सुरू होताच शहरातील अनेक विभागात वीज गायब झाली. अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी व वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरात काही भागात एवढे पाणी रस्त्यावर साचले होते कि, त्यातून मार्ग काढताना अनेक जणांच्या नाकी नऊ आले.
त्यातच रत्नागिरी नगरपरिषद आणि पावसाचे समीकरण काही जुळत नाही. जेंव्हा जेंव्हा पालिका रस्त्यांची कामे करण्याचे मनावर घेते, नेमका तेंव्हाच पावसामुळे कामात अडथला निर्मान होतो. सध्या सुरू असलेले गॅस आणि पाणी पाईपलाईन व अन्य कामे सुरु असल्याने रस्त्यांवर मातीचे ढिगारे व खोदलेल्या चरांमुळे शहरी भागात अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरलेले.
आणि रत्नागिरी शहरात सगळीकडे पडलेल्या पावसामुळे निव्वळ अर्ध्या तासामध्ये राम आळी परिसर “जाम” झाल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने रामआळी परिसरात विक्रीला बसलेल्या फेरीवाले व पादचाऱ्यांना समान भिजू नये धावपळ करताना पळता भुई थोडी झाली. या मुसळधार पावसाने रामआळीमध्ये ढोपरापर्यंत पाणी भरले, त्यामुळे या ठिकाणाहून वाहनांची वाहतूक व पादचाऱ्यांना चालणे पण मुश्कील बनले होते.
रत्नागिरी शहरातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करून रस्ते चकाचक करण्याचे आश्वासन नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी दिल्याने, आता शहरात अनेक ठिकाणी डांबरीकरण करून रस्ते चकाचक करण्याचे काम सुरू होते, परंतु हा पाउस त्यामध्ये विघ्न आणत आहे अशी कुजबुज सगळीकडे सुरु आहे.