रत्नागिरी शहरामध्ये हल्ली अमली पदार्थ सेवन, काळोखाचा रस्ता दारूचा अड्डा अशा अनेक गोष्टी वारंवार कानावर येत आहेत. सध्या चर्चा आहे ती, शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रत्नागिरीतील मध्यवर्ती भागावर माळनाका येथे भलामोठा स्कायवॉक बांधण्यात आला आहे. अवाढव्य स्कायवॉकचा वापर नागरिकांकडून तेवढा होत नाही. या परिसरामध्ये शाळा, महाविद्यालय असल्यामुळे अपघात टाळण्यासाठी मुलांसाठी हा स्कायवॉक बांधला गेला आहे. यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्ची घालण्यात आला आहे.
पण मुलांसाठी त्याचा वापर न होता, त्याचा बऱ्याच प्रमाणात गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बर्याच दिवसांपासून या पुलावर दारूच्या बाटल्याचा खच पहावयास मिळाला आहे. पालिकेकडून स्वच्छताही केलेली गेली नाही. ही बाब पालिकेच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मनसेने गांधीगिरी केली. पुलावरील घाण बाजूला करून तेथे स्वच्छता करण्यात आली. तसेच पुलावर मेणबत्त्या लावल्या आणि शांततेने निषेध व्यक्त केला.
त्याचप्रमाणे, रत्नागिरी शहरात माळनाका येथे उभारण्यात आलेल्या स्कायवॉकची गैरवापर होत असल्याचे मनसेच्या वतीने निदर्शनास आणण्यात आले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर कार्यकारिणीतर्फे माळनाका येथील स्कायवॉकचा अवैध कामांसाठी होत असलेला वापर जनतेपुढे आणला आहे. यावर अंकुश लावण्यासाठी स्कायवॉकवर लवकरात लवकर विजेचे दिवे बसवून येथील साफसफाई करण्याची मागणी मनसेतर्फे केली आहे.
सामान्य जनतेच्या उपयोगी हा स्कायवॉक येत नाही. वीज नसल्यामुळे रात्रीच्यावेळी येथून कोणी जात नाही. विजेचे दिवे लावून आणि साफसफाई करून हा स्कायवॉक लोकांसाठी खुला करावा अशी मनसेने आग्रही मागणी केली. या वेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष रूपेश सावंत, उपशहराध्यक्ष अमोल श्रीनाथ, मयुरेश मडके, गौरव चव्हाण आदी उपस्थित होते.