सोशल मिडीयाचा होणारा अतिरिक्त वापर आणि घडणारे सायबर गुन्हे याबाबत वारंवार जनजागृती करून सुद्धा विविध प्रकारची प्रकरणे समोर येत आहेत. सामान्य जनतेची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होऊ नये म्हणून पोलिसांमार्फत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे तरीदेखील रत्नागिरी जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतच आहे.
मागील दोन वर्षामध्ये एकतर संगणक आणि इंटरनेटचा वापर अवास्तव होत आहे. त्यामुळे काही वेळा अजाणतेपणी सुद्धा अशा सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर सामान्य जनता फसते आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून एकूण ७६ जण सायबर गुन्ह्यांच्या फसवणूकीला बळी पडले आहेत.
फेसबुक बनावट अकाऊंट, पैशांची मागणी करणे, बँक ओटीपी, आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम पीन, बनावट मेसेज लिंक इत्यादीची मागणी करून फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र सेल देखील तयार केला आहे. त्यांच्या माध्यमातून जनजागृती आणि फसवणुकीच्या प्रकारांना प्रतिबंध करण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांना दोन वर्षामध्ये केवळ ७६ पैकी सहा गुन्हे उघड करण्यात यश मिळाले आहे. गुन्हे उघड करण्यात चिपळण उपविभाग आघाडीवर आहे. रत्नागिरी, खेडने दोन वर्षात एकही सायबर गुन्हा उघड करण्यास अपयशी ठरले आहेत. तर लांजा विभागामध्ये पोलीसाना एक गुन्हा उघड करण्यात यश मिळाले आहे.
कोरोनाच्या या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या काळात जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहारावर भर देण्यात आला. त्याचा फायदा काही सायबर गुन्हेगार उठवित आहेत. नागरिकांना वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांची फसवणूक सुरू आहे. पोलीस, बँकांच्या माध्यमातून कायम जनजागृती मोहीम सुरू असून, तरीही नागरिक या आमिषाला बळी पडत आहेत.