कोकणामधील नदीकाठच्या शहरांच्या बाबतीत पूरस्थिती संदर्भात उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयामध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलेले. या बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार शेखर निकम, चिपळूण बचाव समितीचे प्रतिनिधी राजेश वाजे, शाहनवाज शाह आदी मान्यवरांसह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.
नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचा साठा झाला असून, अनेक ठिकाणी गाळाची बेटे देखील तयार झाली आहेत. त्यामुळे त्यांची वहनक्षमता देखील कमी झाली आहे. अतिवृष्टीमुळे होणाऱ्या पूरस्थितीचा फटका नदीकाठावरील गावांप्रमाणेच शहरांतील नागरी वस्त्यांना देखील वारंवार बसत आहे. यावर्षी आलेल्या पूरामुळे नदीकाठच्या शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोकणातील महाड, चिपळूण, संगमेश्वरसह विभागामध्ये अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे नदीकाठच्या शहरांचे, गावांचे दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यासाठी कोकणातील नदीपात्रातील गाळ, बेटे काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज झालेल्या बैठकीत दिले आहेत.
कोकणात पावसाचे प्रमाण कायमच जास्त असते. मागील दोन वर्षामध्ये कोकणाला सातत्याने नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टीचा फटका बसत आहे. दरवर्षी सतत उद्भवणारे हे संकट टाळण्यासाठी कोकणातील नद्यांमधील गाळ, बेटे काढण्याचे काम युद्ध पातळीवर करणे गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी आवश्यक असणारा निधी जलसंपदा विभागाला तातडीने वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत.
चिपळूण शहराला असणारा पुराचा धोका टाळण्यासाठी वशिष्टी नदीतील गाळ, बेटे काढण्याचे काम तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. हे काम वेगाने आणि सुनियोजित पध्दतीने होण्यासाठी एकत्रित रित्या, अनेक ठिकाणी कामांना सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या कामासाठी आवश्यक असणारा निधी तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नदीतील गाळ व त्यामुळे तयार झालेली बेटे काढल्यानंतर नदीची वहन क्षमता वाढणार असून नदीकाठच्या गावांचा, शहरांचा पुराचा धोका कमी होणार आहे.