रत्नागिरी शहरातील नवीन पाणीपुरवठा योजना काम मागील चार वर्षापासून सुरु आहे. ते पूर्ण तरी कधी होणार! रत्नागिरी नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी या कामाला मुदतवाढ देण्याच्या विषयावरून मक्तेदार कंपनीबाबत संताप व्यक्त केला.
सदस्यांच्या मागणीनुसार नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी मुदतवाढीचा निर्णय देताना, आता या वेळेत योजनेचे काम झाले नाही तर कंपनीवर कडक आणि दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. रत्नागिरी शहरात पाणी योजनेचे काम करण्यासाठी मुख्य मक्तेदार कंपनीने उपठेकेदार नेमले असल्याचे भाजपा गटप्रमुख नगरसेवक समीर तिवरेकर यांनी सभागृहात सांगितले.
पाण्याच्या पाईप लाईन आणि रस्त्यांची सुरु असलेली डागडुजी यामुळे अख्खी रत्नागिरी खोडून काढण्यात आली आहे. रस्त्यांची झालेली दुर्दशा, आणि वर्षोनुवर्षे सुरु असलेले काम संपुष्टातच येण्याचे नाव घेत नसल्याने नक्की या पाणी योजनेच काम पूर्ण होऊन जनतेला त्याचा उपयोग केंव्हा होईल ! अजून किती वर्ष हे कामकाज सुरु राहणार ! याबद्दल रत्नागिरीतील नागरिकांच्या मनामध्ये गहन प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, या नियुक्त करण्यात आलेल्या उपठेकेदाराला करण्यात आलेल्या कामांची रक्कम दिली जात नाही. त्यामुळे उपठेकेदारांचे कामगार चालू काम आहे त्या स्थितीत बंद करून दुसर्या कामामध्ये जिथे रोजंदारीचे नियमित पैसे मिळतात तिथे ते जात आहेत, हि गोष्ट सुद्धा गटप्रमुखांनी भर सभेत मांडल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मक्तेदार कंपनी उपठेकेदार नेमते. परंतु त्यांच्या कामाची बिले दिली जात नसल्याने उपठेकेदार काम बंद करतात. त्यामुळे योजना पूर्ण होण्यास उशीर होत असून कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली.