भाजप नेते किरीट सोमय्या यांनी येत्या दहा दिवसांमध्ये आघाडी सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा केला आहे. आर्थिक कमाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून घाबरवण्याचं काम सुरू आहे, मागील दोन वर्ष लूट माजवली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, मुंबईत कोरोनाचा रुग्णसंख्येचा आकडा जरी वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे पडले आहेत.
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आज ६८ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत ५७८ ओमायक्रॉन बाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी २५९ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
बीकेसी मध्ये २४०० बेडपैकी केवळ ८०० बेड्स वर रुग्ण अॅडमिट आहेत. दहिसरमध्ये ७५० बेड्स उपलब्ध आहेत पण अजून एक पण रुग्ण तिथे दाखल झालेला नाही. नेस्को गोरेगाव मध्ये २००० बेड्सपैकी ९०० रुग्णांनी बेड्स फुल झाले आहेत. याचाच अर्थ केवळ ९८ टक्के रुग्ण दाखल झाले आहेत. त्यातील काही आपल्या घरी किंवा नर्सिंग होम विलगीकरणामध्ये बरे होतात. ज्यांचे लसीकरण झाले त्यातील ९९.९९ लोक हे सुरक्षित आहेत, असं सोमय्या यांचे म्हणणे आहे.
सोमय्या म्हणाले की, सत्ताधारी नेते आणि त्यासोबत काही आयएएस अधिकारी मुद्दामून ज्या पद्धतीने घाबरवण्याचे काम करत आहेत ते का? कारण कोविड सेंटर हे त्यांच्यासाठी कमाईचे साधन बनले आहे. येत्या दहा दिवसात मी ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा प्रसिद्ध करणार असून, येत्या दहा दिवसात या सगळ्या घोटाळ्यांचे कागदपत्र मी जनतेसमोर सादर करणार आहे, असं त्यांनी सांगितले.