रत्नागिरी तालुक्यातील पाली नजिकच्या साठरेबांबर गावामधील धनावडेवाडी येथे रविवारी पहाटे भक्ष्याचा पाठलाग करताना अंधारामध्ये विहीर दिसली नसल्याने बिबट्या विहिरीमध्ये पडला. सायंकाळी त्याचा ओरडण्याच्या आवाज आल्याने, शिवाय विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी भरले असल्याने, त्याला पिंजरा सोडून तत्काळ सुखरूप बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, साठरेबांबर गावामधील धनावडेवाडीतील रहिवाशी योगेश जयराम धनावडे यांच्या घरालगतच्या विहिरीमध्ये पहाटेच्या दम्यान भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला होता. सायंकाळी विहिरीतून बिबट्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने, त्यांनी जाऊन पाहणी केली असता, विहिरीत पाण्यामध्ये बिबट्या पडल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी तात्काळ याबाबत माहिती पाली परिमंडळ वन कार्यालयाचे वनपाल गौतम कांबळे यांना दिली. त्यांनी तात्काळ हालचाल करून रात्रीच पाली येथील पिंजरा घेऊन, साठरेबांबर येथे जाऊन बिबट्याच्या सुटकेसाठी तो विहिरीत सोडला.
विहीर जवळपास २५ फूट खोल आहे. तर १० फुटापर्यंत पाणी होते. त्यावर बिबट्या तरंगत होता. तब्बल ३ तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्या पिंजऱ्यामध्ये गेल्यावर त्याला वर आणून वैद्यकीय तपासणी वनविभाग पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी केली असता, तो नर जातीचा सहा वर्षांचा असून तो सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले.
बिबट्याची सुटका मोहीम विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सचिन नीलख, रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ वन कार्यालय पालीचे वनपाल गौतम कांबळे, देवरूख वनपाल तौफिक मुल्ला, मिताली कुबल यांनी स्थानिक ग्रामस्थ दिनेश चाळके, धनंजय चव्हाण, संतोष चव्हाण ,नयन साठले ,विजय बारगुडे , सचिन पेडणेकर, लांजा वनपाल दिलीप आरेकर, वनरक्षक नानु गावडे, विक्रम कुंभार, सागर पाताडे, राजेंद्र पाटील, सरपंच वामन कांबळे यांच्या सहाय्याने पार पाडली. बिबट्याला पुन्हा सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.