मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कासवाच्या गतीने चालणाऱ्या कामकाजामुळे अनेक तालुक्यांमधून विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची रस्ता रोको आंदोलने करण्यात आली. परंतू, तरीसुद्धा महाम्रागाच्या कामाची गती काही केल्या वाढत नाही. मागील तीन वर्षापासून, सुरु असलेले काम अजूनपर्यंत पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे शिवसेनाच आता रस्त्यावर उतरून लोकांच्यासाठी आंदोलन करणार आहे, असे आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.
खास. विनायक राउत यांनी काही दिवसांपूर्वी असे विधान केले होते कि, महामार्गाचे कामकाज वेगाने पूर्ण होण्यासाठी आता आमदार, खासदारांनी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. मुंबई-गोवा महामार्ग हे कोकणवासीयांचे स्वप्न होते आणि यामुळेच माजी मंत्री अनंत गीते व खासदार विनायक राऊत या सर्वांनी हा महामार्ग झालाच पाहिजे असे ठरवले होते. त्याप्रमाणे त्या वेळचे व आत्ताचे बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होऊन महामार्गाच्या कामाला जोरदार सुरुवात झाली होती आणि हे स्वप्न पूर्ण होणार असा विश्वास आम्हाला होता परंतु आता ही महामार्गाचे काम पूर्णपणे ठप्प झाले असून यासंदर्भात खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वामध्ये अनेक बैठका झाल्या व मार्ग देखील काढण्याचा प्रयत्न केला परंतु हे काम पुढे जातच नाही.
आता रखडलेल्या या महामार्गाच्या धीम्या कामाबाबत लोकांच्या भावनांचा उद्रेक निर्माण होत आहे. अगदी काही वर्षांच्या सुरुवातीपासून बघायला गेले तर, या महामार्गाच्या कामाला अकरा वर्ष उलटली आहेत संपूर्ण भारतात असे महामार्गाचे काम कुठेच रखडलेले असू शकत नाही त्यामुळे लोकांच्या चीड निर्माण झाली आहे. लोकांच्या या भावनेची दखल घेऊन शिवसेनेसह महाआघाडीतील सर्व घटक २७ तारखेला रास्ता रोकोसारखे आंदोलन करून लोकांच्या भावना केंद्र शासनापर्यंत पोहोचविणार असल्याचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी सांगितले आहे.