कोरोनामुळे मागील दोन वर्षामध्ये अनेक जणांचे नोकरी काम धंदे पूर्णपणे बंद झाले. उत्पन्नाचे साधन काही उरले नसल्याने अनेक जन बेरोजगार झालेत. अनेक जणांना नोकरी, कंपनीमधून कमी करण्यात आले. त्यामुळे जसे मनुष्याचे नुकसान झाले आहे त्याप्रमाणेच कंपन्यांना देखील मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला आहे. तसेच कंपनीमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने असणाऱ्या कामगारांवर अतिरिक्त भार पडत आहे.
सध्या कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने, नोकरी, व्यवसाय, कंपनी पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे आता त्यांना अनेक कारागिरांची आवश्यकता भासू लागली आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या जुन्याच कर्मचार्यांना परत बोलावून जॉईन करून घेतले आहे तर अनेक कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती सुरु करण्यात आली आहे.
राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे इत्यादी उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे रोजगाराची समस्या निर्माण झाली असतानाच, आता राज्यातील खासगी, सार्वजनिक अशा जवळपास ९४ हजार उद्योगांनी मनुष्यबळ मागणीसाठी राज्याच्या कौशल्य विकास व उद्योजगता विभागाकडे नोंदणी केली आहे. त्यातून चालू वर्षांच्या सुरुवातीलाच जानेवारी २०२२ पासून सात हजारांहून अधिक बेरोजगारांना विविध उद्योगांमध्ये रोजगार प्राप्त झाला आहे.
या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी अशा विविध उपक्रमांद्वारे गेल्या वर्षी राज्यात २ लाख १९ हजार व त्या आधी २०२० मध्ये १ लाख ९९ हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याची माहिती दिली आहे.