मुंबई शहरातील प्रसिद्ध आणि सर्व खेळांसाठी उपयुक्त मैदान म्हणजे ऐतिहासिक शिवाजी पार्क. अनेक ऐतिहासिक घटनाचं साक्षीदार आहे हे शिवाजी पार्क. अगदी इतिहासातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे केंद्रबिंदू म्हणजे शिवाजी पार्क होय. याच ऐतिहासिक शिवाजी पार्कवर अनेक मान्यवरांचे अंत्यसंस्कार पार पडले आहेत. पण त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मात्र अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात.
दिनांक ६ फेब्रुवारी रविवार रोजी भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यानंतर शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांचे सुद्धा स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी विविध पक्षांकडून करण्यात येत होती, परंतु मंगेशकर कुटुंबीयांनीच यावर स्पष्ट सांगितले आहे कि, लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्क येथे स्मारक व्हावे असा आमचा कोणताही आग्रह नाही, त्यामुळे त्यावरील राजकारण थांबवावे. या पार्श्ववभूमीवर ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्कमध्ये आता यापुढे कोणावरही अंत्यसंस्कार केले जाऊ नयेत, तसेच कोणाचेही स्मृतिस्थळ उभारले जाऊ नये, अशी मागणी करणारी याचिका शिवाजी पार्कचे रहिवासी प्रकाश बेलवडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
मुंबई दादरमधील शिवाजी पार्क हे एकमेव मोठे खेळाचे मैदान आहे. यामुळे यापुढे शिवाजी पार्कमध्ये कोणाचेही स्मृतिस्थळ उभारण्यात येऊ नये आणि कोणत्याही व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले जाऊ नयेत, असे निर्देश राज्य सरकार व महापालिकेला द्यावेत, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. व्हीआपी लोकांचे अंत्यसंस्कार शिवाजी पार्क मध्ये केले जात असल्याने, त्याठिकाणी सर्वसामान्य जनतेचे गर्दी आणि पोलिसांचा मोठ्या प्रमाणात ताफा यामुळे जनजीवन विस्कळीत होते. आणि शिवाजी पार्क हे एक खेळाचे मैदान असल्याने त्याचा वापर केवळ तेवढ्याच गोष्टीसाठी करण्यात यावा अशी जनसामान्यांचे मत आहे.