महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोपांचा मारा करणारे आणि जुनी प्रकरणे उकरून काढणारे भाजप नेते किरिट सोमय्या यांनी अजून एक ट्विट करुन माहिती दिली आहे. भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरुन राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, कौशल्य विकास व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे दोघे सध्या कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. आत्ता या आघाडीतील दोन मंत्र्यांनंतर आणखी एका मंत्र्यांविरोधात केंद्र सरकारने फौजदारी प्रक्रिया सुरु केल्याने महाविकास आघाडी सरकारला जबरदस्त झटका लागला आहे.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत असतानाच आता केंद्र सरकारने राज्याचे परिवहन मंत्री व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अनिल परब यांच्या विरोधात बेनामी संपत्ती प्रकरणी रत्नागिरी न्यायालयामध्ये दावा दाखल केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे समुद्र किनारी अनिल परब यांचा बेकायदेशीर रिसॉर्ट आणि बंगला आहे. त्याचे बांधकाम हे सागरी नियमन कायद्याचे उल्लंघन करुन करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला आहे. तसेच, त्यांच्या बांधकामासाठी अनिल परब यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून! , असा थेट सवाल करत बेकायदेशीर मार्गाने मिळवलेल्या पैशांच्या आधारेच रिसॉर्ट आणि बंगल्याचे बांधकाम झाल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी केला आहे.
त्यामुळे या खर्चाचा आणि असणाऱ्या त्यांच्या बेनामी संपत्तीची चौकशी देखील करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, या प्रकरणात मनी लाँड्रींग झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दापोली न्यायालयात अनिल परब यांच्या विरोधात दावा दाखल केला आहे. त्याची सुनावणी ३० मार्च रोजी दापोली न्यायालयात होणार आहे.
अनिल परब यांच्या विरोधात केंद्राने न्यायालयात दावा दाखल करताच किरिट सोमय्या यांनी ट्विट करून आता ‘अनिल परब यांचा नंबर लागणार’, असे म्हटले आहे. यापुर्वीही किरिट सोमय्या व इतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीच्या किमान चार नेत्यांना तरी घरी पाठवणार, असा इशाराच दिला होता. त्यापैकी दोन जण आता कोठडीमध्ये आहेत.