रत्नागिरी शहरामध्ये सुरु असलेल्या हेल्मेट सक्तीमुळे जनता हैराण झाली आहे. ट्रॅफिक पोलिसांना केवळ हेल्मेट नसलेल्यांवर कारवाई एवढेच काम असल्यासारखी स्थिती दिसते. हेल्मेट वापर कायद्याने बंधनकारक आहे. मात्र या कायद्याची कार्यवाही केवळ रत्नागिरी शहरापुरतीच मर्यादित करण्यात आली आहे का ? अन्य शहरांमध्ये ही सक्ती दिसून येत नाही. मात्र रत्नागिरी शहरात मार्च एंडिंग वसुलीचे टारगेट ठरवून ही कारवाई येते आहे असे जनतेचे मत आहे.
जनतेला वेठीस धरून ही मनमानी सुरू आहे. टू व्हीलर चालकांना रत्नागिरी शहरातील रस्त्यांची परिस्थिती, नसलेला फुटपाथ, बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या गाड्या, बंद सिग्नल या सर्वांचा त्रास सहन करत वर हेल्मेट सक्तीचा सामना करावा लागत आहे. केवळ रत्नागिरीतील जनता शांत, संयमी असल्याने दंड वसुलीचे टारगेट ठेवून हेल्मेट सक्ती केली जात आहे. यासंदर्भात भा.ज.पा.ने दि. २९/०३/२०२२ रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना पत्र देवून रत्नागिरी शहरातील हेल्मेट सक्ती शिथिल करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरात रस्त्यांची झालेली अवस्था आणि सुरु असलेली कामे बघता वेगाने गाडी चालवणे केवळ अशक्य आहे. अशा स्थितीत शहरातील अपघातही अपवादात्मक असतात. त्यामुळे रत्नागिरी शहरातील रस्त्यांची स्थिती, पार्किंगसाठीची अपुरी सोय, वर्षातले निम्मे दिवस तरी बंद असलेले सिग्नल यंत्रणा या सर्वाचा विचार करून हेल्मेट सक्ती शिथिल करून, टु व्हीलर चालकांच्या पाठी लावलेला जाच थांबवावा. हेल्मेट संदर्भाने कारवाई साठी लागणारा प्रचंड मनुष्यबळ खर्ची पडत असून ते ट्रॅफिक नियंत्रणासाठी वापरावे अशी आग्रही मागणी भा.ज.पाने केली आहे.