महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. मुंबई-गोवा महामार्गावर रोज एक दोन अपघात घडतच आहेत. आधी महामार्गावर विविध ठिकाणी सुरु असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत होत्या. त्याच प्रमाणे महामार्गावर वाहतुकीसाठी करण्यात येणारि वाहने देखील बेदरकारपणे चालक चालवत असल्याने, अनेकदा अपघात होत होते. अनेकदा जीवितहानी देखील झाली असून, वाहनांचा तर अक्षरश: चुराडा झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहनांची अवस्था पाहून अपघाताची भीषणता लक्षात येते.
मुंबई – गोवा महामार्गावर वारंवार अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसतेय. दररोज एक अपघात होताना दिसून येतोय. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कामथे येथे रिक्षा व कार यांच्यात झालेल्या अपघातात ७ जण जखमी झाले आहेत. तर रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. कार पलटी होऊन त्यातील प्रवाशी जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्त रिक्षा रत्नागिरीहून चिपळूणच्या दिशेने जात होती. तर खेड हुन एक कार रत्नागिरीच्या दिशेने जात होती. यावेळी कामथे घाटात दोन्ही वाहने अचानक समोरासमोर आल्याने दोघांचा देखील वाहनांवरील ताबा सुटल्याने जोरदार धडक बसली. या दोन्ही वाहनांची धडक एवढी जोरदार होती की, रिक्षाच्या छप्पर अक्षरशः निखळून आले आणि त्याचा पुरता चेंदामेंदा झाला आहे. या अपघातामध्ये दोन्ही वाहनातील प्रवासी जखमी झाले असून, रिक्षातील तिघेजण तर कार मधील चार जण जखमी झाले आहेत. जखमींना खासगी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहनांच्या अपघाताने काही वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली परंतु, वाहतूक पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.