रत्नागिरी तालुक्यातील चवे फाटा येथील चिरे खाणीवर चिरे कापण्याचे मशीन अंगावर पडल्याने कामगाराचा पाय कापला जाण्याची घटना घडली त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. रवी बापू जाधव वय ३५ मूळ राहणार दुधनी, सोलापूर असे मृत कामगाराचे नाव आहे.
रत्नागिरी तालुक्यातील चवे फाटा गावातील चिरेखाणीवर विनोद शिंदे हे मशिन ऑपरेटर म्हणून काम करीत होते. कामाचे दरम्यान त्यांना फोन आला म्हणून त्यांनी ते चालवत असलेली चिरे खाणींची मशिन बंद करून फोनवर बोलत असतानाच त्या ठिकाणी चिरेखाणीवर काम करीत असलेल्या रवी जाधव हा कामगार आला. त्याने सदरची बंद केलेली मशीन चालू केली. रवी याला मशीन चालवता येत नसल्याने मशिन उडाले त्याबरोबर रवी ही उडाला व मशीनवर जाऊन पडला. त्यावेळी मशीनच्या ब्लेडने त्याचा पाय कापला गेला ही घटना घडल्यावर इतर कामगारांनी त्याला तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल केले तेथे त्यांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला.
शेती करणे, नांगरणे, चिरेखाण यासारखी अंग मेहनतीची कामं सोपी करण्यासाठी आता विविध प्रकारची अद्ययावत मशिन उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे मनुष्य बळही वाचते, आणि कष्टकऱ्यांचे श्रमही वाचतात. पण यासारखी मशिन वापरताना काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. कारण जराशी हलगर्जी बाळगली, तरी एखाद्याच्या जीवावर बेतू शकते किंवा गंभीर दुखापतही होऊ शकते. खाणीवर काम करणाऱ्या युवकाचा मशिनमध्ये अडकून पाय कापला गेल्याने अचानक मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ही हृदयाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करताना त्याबाबत सर्व व्यवस्थित माहिती करून घेणे जरुरीचे आहे.