महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलाढाली घडून नवीन पर्व सुरू झाले असून, महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी नुकतीच शपथ घेतली आहे. त्यांच्या सोबत भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आतापर्यंत अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुभेच्छा देत नवा संसार सुखाने करा, असे म्हटले आहे.
तसेच आम्ही नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये अडथळे निर्माण करणार नाही. त्यामुळे त्यांनी जनतेसाठी काम करावे, असे राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना कमकुवत झाली आहे आणि नाराज आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर राऊत म्हणाले, “मला वाटत नाही की आमची संघटना कधी कमकुवत झाली आहे… कोणी नाराज नाही.” आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आमदार खूश होतील, असेही राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदेंचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला असून, त्यांच्यासोबत आता देवेंद्र फडणवीस देखील आहेत, त्यामुळे या दोघांनी मिळून राज्याचे प्रश्न मार्गी लावायला हवे. हे करत असताना प्रशासन, पोलिस दल निपक्षपणे काम करेल याची देखील काळजी घ्यायला हवी. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी पक्षाचे आदेश पाळून उप मुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस हे दोघे एकमेकांचा उजवा हात आहे. दोघांनी मिळवून राज्य पुढे न्यावे, असेही राऊत म्हणाले.
पुढे राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेंचा भाजपमध्ये सन्मान झाला असेल तर ही चांगली बाब आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे काम भाजपकडून करण्यात आले आहे. शिवसेनेचे उपकार सगळ्यांवरच आहे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्ष वाढवण्याचे प्रयत्न करू.