राज्यात सायबर क्राईम गुन्ह्यात लक्षणीय वाढ झालेली आहे. अनेक बँकांच्या नावाने अनेकांना खोटे फोन करून फसवणूक करण्यात येते. येणारे फोन नंबरही रोजच्या वापरातील नंबर सारखेच असल्याने अनेक वृद्ध मंडळी या अशा प्रकरणांना बळी पडतात आणि आर्थिक नुकसानीला सामोरे जातात. बँक वेळोवेळी आपल्या ग्राहकांना जागरूक करत असते, परंतु, काही वेळेला ग्राहक गोंधळून गेल्याने अशा प्रकारचे नुकसान होते. पोलिसही अनेक वेळा अशा सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत जनतेमध्ये जागरूकतेचे मेसेज करून अथवा व्हिडीओद्वारे मेसेज पोहोचवून सतर्क राहायला सांगत असतात.
रत्नागिरीमधील टिळक आळी येथे राहणारे कैलास किनरे यांची एक अज्ञाताने अशाच प्रकारची फसवणूक केली आहे तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलेलं नाही असे अज्ञात व्यक्तीने फोन करून सांगितले. आधारकार्ड नंबर घेऊन आलेला ओटीपी मागून त्यांच्या बँक खात्यातून ४४ हजार ९९५ रुपये ऑनलाईन काढून घेऊन त्यांची फसवणूक केली आहे.
कैलास किनरे हे मूळचे कशेळीचे परंतु, कामानिमित्त टिळक आळी येथे भाड्याने वास्तव्यास होते. अचानक आलेल्या अशा फोनने ते गांगरून गेले आणि अज्ञात व्यक्तीला आधार कार्ड नंबर देऊन, आलेला बॅंकेचा कोडही सांगितलं, बँकमधून ४४ हजार ९९५ रुपये काढले गेल्याचा मेसेज आल्या नंतर समोरून आपली फसवणूक करण्यात आल्याचे लक्षात येताच किनरे यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये त्वरित जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेऊन पुढील तपास आणि कारवाईला सुरुवात केली असून, सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साळूंखे हे करत आहेत.