दिवसेंदिवस होणारी जंगलाची तोड त्यामुळे वन्य प्राण्यांचा आसरा नष्ट होत चालला आहे. हळूहळू वन्य प्राणी वाडी वस्तीमध्ये यायला लागले आहेत. पूर्वी कोल्हे, वानर, डुक्कर, हत्ती असे प्राणी शेतीची नासधूस करायला येत असत. परंतु, वाघ, तरस, जंगली डुकरं, गवे, बिबटे असे हिंस्र पशू सुद्धा वस्तीमध्ये यायला लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गवाणे मावळत वाडीमध्ये राहणाऱ्या प्रमोद करंबेळे या शेतकऱ्याच्या गोठ्यातील १० बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला चढविला असून, चार बोकड आणि सहा बकऱ्यांचा खात्मा केला आहे. गेल्या १५ वर्षांपासून प्रमोद करंबेळे हे सदर शेळीपालनाचा व्यवसाय करत आहेत, आणि याच व्यवसायावर ते त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ भागवतात.
त्यांच्या घर शेजारीच चिरेबंदी असलेला शेळ्यांचा गोठा आहे. या गोठयमध्ये एकूण ३६ बोकड आणि काही बकऱ्या बांधलेल्या असतात. त्यातील एकूण १० बकऱ्या मध्यरात्री येऊन बिबटयाने फस्त केल्या. खास कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी विकसित केलेल्या कोकणकन्या प्रजातीच्या ३६ बकऱ्या होत्या, त्यातील १० बकऱ्यांवर बिबट्याने हमला चढविला. त्यामध्ये या शेतकऱ्याचे साधारण ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्रमोद करंबेळे यांच्या गोठ्याला वरच्या बाजूला बांबू ठोकलेले असून, ते तोडून मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने बकऱ्यांवर हल्ला केल्याचे समजते. रात्री रोजप्रमाणे रात्री १ वाजता गोठ्यात फेरी मारून आले असता, तेंव्हा काहीच घडले नव्हते, सकाळी ५ च्या दरम्यान फेरी मारली असता १० बकऱ्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. रात्री कोसळणाऱ्या पावसामुळे घराशेजारी गोठा असूनही या घटनेचा मागमूस लागला नाही. या घटनेची माहिती मिळताच लांजाचे वनपाल दिलीप आरेकर, वनरक्षक विक्रम कुंभार यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन, पंचनामा केला आणि रत्नागिरी पशुधन विकास अधिकारी कानसे, आणि लांजा पशुधन विकास अधिकारी तोरस्कर यांनी गवाणे येथे जाऊन मृत बकर्यांचा छव विच्छेदन केले. १२ दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झाले आणि त्यानंतर पाठोपाठ ही घटना घडल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.