केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या सभेवर टीका केली होती. त्यावेळी बोलतांना ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे तेंव्हा असून देखील मला मुख्यमंत्री केले होते. तुम्ही १० वर्ष मुख्यमंत्री राहिलात तरी माझ्या ८ महिन्यांच्या कामाची बरोबरी कधीच करु शकणार नाहीत. शिवसेनेची सभा म्हणजे शिवसंपर्क अभियान नाही तर शिव्या संपर्क अभियान आहे, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली होती.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या जोरदार टीकेनंतर आता शिवसेना प्रवक्ते आणि आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका करत पलटवार केला आहे.
ना. राणे म्हणजे कोकणी भाषेत सांगायचे झाले तर चव ना ढव, पण पाहुण्या पोटभर जेव असे आहे. राणे यांचे नाव कोकण आणि महाराष्ट्र विसरली आहे. त्यामुळे आपले नाव आठवणीत ठेवण्यासाठी राणे यांची धडपड सुरू असल्याची टीका जाधव यांनी केली आहे.
जाधव यांनी या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मनसे नेते राज ठाकरे यांच्यावरही कडाडून टीका केली आहे. फडणवीस यांची सभा मराठी माणसाचा व नेत्यांचा अपमान करणारी सभा असून हिंदी भाषिकांसमोर मराठी भाषिकांचा आणि नेत्यांचा अवमान करणारी सभा होती, अशीही त्यांनी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सभेत आयएनएस विक्रांतच्या संबधित निधी प्रकरणी काही बोलणे का टाळले असा प्रतिप्रश्न भास्कर जाधवांनी केला आहे. तर अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरे यांचे नाव न घेता “करून करून भागला आणि देवपूजेला लागला” असा जोरदार टोला आमदार जाधव यांनी हाणला.