भारत-पाकिस्तान या दोन देशांमध्ये संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच रत्नागिरीत तहसील कार्यालयावर बॉम्ब हल्ला झाला. या हल्ल्यात १२ ते १३ कर्मचारी जखमी झाले असून जखमींना उपचाराकरिता जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास झाला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधी संतापाची लाट उसळली आहे. निष्पाप पर्यटकांचा बळी अतिरेक्यांनी घेतला आणि त्यानंतर पाकिस्तान विरोधी संतापाची लाट उसळली. भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आणि गेले १४ दिवस भारतीय लष्कराने युद्ध सरावाला सुरूवात केली. भारतीय सैन्याने आपली ताकद संपूर्ण जगाला दाखवली. त्यातच केंद्र सरकारने युद्धजन्य परिस्थितीत सर्वसामान्य जनतेसाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात आणि कशाप्रकारे कराव्यात यासाठी महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलची घोषणा केली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश होता.
सायरन वाजू लागला – बुधवारी नेहमीप्रमाणे शासकीय कामकाज सुरू होते. रत्नागिरीच्या तहसीलदार कार्यालयात नागरिकांची ये-जा सुरू होती. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा धमाकेदार आवाज झाला. आवाजानंतर सायरन वाजू लागला आणि सर्व यंत्रणा तहसील कार्यालयाच्या दिशेने धावू लागली.
३ ते ४ बॉम्ब फुटले – बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक तहसील कार्यालयात धमाकेदार आवाज झाला. एकामागोमाग एक धमाके होऊ लागले. या धमाक्यानंतर लोकं सैरावैरा धावू लागली. किंकाळ्यांचे आवाज घुमू लागले. बॉम्ब हल्ला झालाय हे लक्षात आल्यानंतर सर्व यंत्रणा तहसील कार्यालयाच्या दिशेने धावली.
१२ ते १३ जखमी – तहसील कार्यालयात झालेल्या बॉम्ब हल्ल्यात १२ ते १३ कर्मचारी जखमी झाले. काही नागरिकांचा देखील त्यात समावेश होता. सायरन वाजल्यानंतर शीघ्र कृतीदल व कमांडोज आदींनी घटनास्थळी धाव घेतली. रूग्णवाहिका वेगाने तहसील कार्यालयात दाखल झाल्या. परिसरात तुडुंब गर्दी लोटली.
रूग्णालयात हलविले – या हल्ल्यातील जखमींना तात्काळ रूग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे हे आपल्या दालनात उपस्थित होते. धमका झाल्यानंतर ते स्वतः दालनातून बाहेर पडले आणि कर्मचाऱ्यांसह नागरिकांना त्यांनी सुरक्षित इमारतीतून बाहेर आणले.
बडे अधिकारी दाखल – या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, डिवायएसपी निलेश माईणकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली व घटनेबाबतची माहिती जाणून घेतली.
सुटकेचा श्वास – होय…! असाच थरार रत्नागिरीतील तहसीलदार कार्यालयात पहायला मिळाला. मात्र जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी हे मॉक ड्रिल असल्याचे घोषित केले आणि साऱ्यांनीच सुटकेचा श्वास सोड़ला.
प्रशासन अलर्ट – यावेळी बोलताना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग व पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडून ज्या सूचना मिळाल्या त्याचे पालन या ठिकाणी करण्यात आले. प्रशासन युद्धजन्य परिस्थितीत अलर्ट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. याचा अहवाल राज्य व केंद्र सरकारला तात्काळ पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.