कोरोना काळामध्ये डॉक्टर, नर्स, वैद्यकीय स्टाफ, आशा सेविका यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. दिवस रात्र वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत या सर्वानीच कोरोना रुग्णालयात सेवा बजावली आहे. जिल्ह्यातील मागील काही दिवस आशा सेविका आणि गटप्रवर्तक हे विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील आशा सेविका आणि गटप्रवर्तक हे रविवारी सुद्धा दररोज सारखे ८ तासांपेक्षा जास्त ड्युटी बजावत आहेत. त्यामुळे कोरोना काळामध्ये एवढा धोका पत्कारून काम करणे जिकरीचे बनले आहे. त्यामुळे इतर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांना सुद्धा शासकीय सेवेमध्ये कायम करण्याचे मागणीपत्र आम. भास्कर जाधव यांच्याकडे सुपूर्द केले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांना शासकीय सेवकांचा दर्जा द्यावा हि मागणी मान्य होईपर्यंत आशा सेविकांना मासिक १८ हजार आणि गटप्रवर्तकांना २२ हजार रुपये वेतन देण्यात येण्याची मागणी केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सल्ल्यानुसार, मनुष्याने कोरोनाच्या बरोबर जगण्याची सवय लावली पाहिजे, त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना सात ते आठ तास काम करावे लागणार असल्याने, त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्याच्या मागणीने जोर धरला आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना संबंधित काम केल्यामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना ५० लाख रुपायचे विमाकवच देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत, त्या आदेशामध्ये आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचा उल्लेख स्पष्ट केलेला नाही, तो स्पष्टपणे करण्यात यावा असे मागणीपत्र चिपळूण तहसील कार्यालयामध्ये आम. भास्कर जाधव, यांच्या समवेत प्रांत प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.