रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील कासव संवर्धन मोहिमेला चालना मिळाली आहे. यंदा येथील किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची संख्या गतवर्षीपेक्षा अधिक आहे. आतापर्यंत १४१ घरटी संरक्षित केली असून, त्यात १४ हजार १३३ अंडी संरक्षित केली गेली. त्यातील सुमारे ५ हजार पिल्ले समुद्रात विसावली आहेत. ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन करण्यासाठी गेल्या काही वर्षांत वनविभागाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. समुद्रकिनारी भागातील लोकांमध्ये जनजागृती करत स्थानिकांच्या मदतीने घरटी संवर्धनासाठी कासवमित्र तयार केले आहेत. त्यामध्ये पावस परिसरातील गावखडी, गणेशगुळे किनाऱ्यावर कासव संवर्धनाचे काम ग्रामपंचायत आणि वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप डिंगणकर, रोशन पाटील, राकेश पाटील हे करत आहेत.
तुलनेत यंदा कासवांचा विणीचा हंगाम उशिराने सुरू झाला; मात्र तरीही सर्वाधिक घरटी या किनाऱ्यावर सापडली आहेत. वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या किनाऱ्यावर १४१ घरटी संरक्षित करण्यात यश आले आहे. योग्य कालावधी झाल्यानंतर अंड्यातील पिल्ले बाहेर येतात. त्यांच्यावर कासवमित्र लक्ष ठेवून असतात. त्यामुळे आपसूकच त्यांचे संरक्षण होते. आतापर्यंत ५ हजार ५५ पिल्ले समुद्रात सोडली आहेत. अजून पन्नास टक्के अंडी शिल्लक आहेत. ती टप्प्याटप्प्याने समुद्रात विसावतील, सांगण्यात आले. असे दरम्यान, यंदा सर्वाधिक अंड्यांचे संवर्धन गुहागर तालुक्यात झाले आहे. त्या पाठोपाठ कदाचित गावखडी येथील किनाऱ्यावर सर्वाधिक अंडी सापडली असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.