कोरोनाच्या कालच्या दिवसातील नवीन बाधितांच्या तुलनेत आज राज्यात नव्या बाधितांच्या संख्येमध्ये वाढ पाहण्यास मिळली आहे. गेल्या २४ तासात राज्यातील नव्या कोरोना बाधितांची संख्या एक हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत अजून भर पडली आहे. राज्यामध्ये मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत असल्याने, राज्य सरकारकडून सावध पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात १,०८० नवे रुग्ण आढळून आले असून, एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला नाही ही केवळ त्यातील दिलासादायक बाब आहे. तर ५२४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०७ टक्क्यांवर गेले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के एवढा असून, सध्या राज्यात ४ हजार ३२ सक्रीय रुग्ण आहेत.
दरम्यान, एकीकडे राज्यात पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्येमध्ये वाढ होत असताना, बाधित होणाऱ्यांच्या सर्वाधिक संख्येत मुंबई अग्रेसर आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ७३९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या चार हजार ३२ इतकी झाली असून, सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये आहेत. मुंबईत २९७०, ठाणे ४५२ आणि पुण्यात ३५७ बाधित रुग्ण आहेत.
मुंबईत देखील नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून, येथील रूग्ण बाधित होण्याचा दर ६ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे काहिशी चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुंबईतील वाढता पॉझिटिव्हिटी रेट लक्षात घेता कोविड चाचण्या करण्याला गती दिली जाईल, असे मुंबई महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.