राम मंदिर उदघाटन असो की १ फ `ब्रुवारीला झालेले बजेट असो यामुळे २५ मे पर्यंत मोदी सरकार राहील की नाही ही शंका असून, त्यांना एवढी घाई झाली आहे की, मार्च मध्येच निवडणुका लागण्याची शक्यता काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांनी सांगितले. ज्या पध्दतीने गुंडगिरी करुन, पैशाचा वापर करुन, लोकशाहीने निवडून आलेले सरकार पाडण्यात आले. त्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिक खवळलेला आहे. महाराष्ट्रातील नागरिक गद्दारी सहन करीत नाही, येणाऱ्या निवडणुकीत ही जनता दाखवून देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आलेल्या आ. भाई जागताप यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, डोळ्यासमोर आता लोकसभा निवडणुका असून, राम मंदिराचे उद्घाटन घाईघाईने करुन घेणे आणि त्याचा फायदा लोकसभेला उठवणे या एकाच उद्देशाने हे उदघाटन करण्यात आले आहे हे स्पष्ट होत आहे. एप्रिलमध्ये गतवेळी निवडणुका झाल्या होत्या. २५ मेला मोदींचे दुसऱ्यांदा नवीन सरकार स्थापन झाले. यावेळी तेवढाही काळ हे सरकार राहील की नाही हे शंका आहे. नुकतेच झालेले बजेट व त्यानंतर झालेली जुमलेबाजी यामुळे हे दिसून येत आहे.
त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका कदाचित मार्चमध्येच होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत याठिकाणी प्रतिनिधीत्व करीत असून निवडून येत आहेत. परंतु आघाडी म्हणून काँग्रेसचा त्यांना कसा फायदा होईल याचा आढावा घेण्यासाठी या बैठका घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. एकेकाळी रत्नागिरीत ६ आमदार काँग्रेसचे होते. तो सुवर्णकाळ होता. त्यानंतर काँग्रेसची झालेली पुट, राष्ट्रवादी झाल्यानंतर काँग्रेसचे वैभव कुठेतरी कमी झाले असल्याची जाणिव आपल्याला असून वरिष्ठांनाही याची कल्पना दिली असल्याचेही भाई जगताप यांनी सांगितले.