रत्नागिरी पालिकेतील मनुष्यबळ पुरवठा कंत्राटात कामगारांचे शोषण सुरू आहे. त्या कामगारांना दिला जाणारा पगार लाटला जात आहे. कंत्राटी कामगारांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार किमान वेतनाप्रमाणे निघाला नाही तर मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध बेमुदत आंदोलन करु. त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईची मागणी करणार असल्याचा इशारा कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक (लेबर राईटस्) राज असरोंडकर यांनी दिला. शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत असरोंडकर बोलत होते. यावेळी रत्नागिरी तालुका समन्वयक विजयकुमार जैन, राकेश मीना हेदेखील उपस्थित होते. ते म्हणाले, ‘रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची या संदर्भात भेट घेतली.
चर्चा करून त्यांना निवेदनही दिले. प्रत्येक विभागात मनुष्यबळ पुरवठ्याचे कंत्राट सुरु झाल्याच्या तारखेपासून प्रत्येक कंत्राटदाराने देयकासोबत जोडलेल्या पावत्या/पुराव्यानुसार होणारी रक्कम आणि पालिकेकडून कंत्राटदारांना प्रत्यक्षात दिले गेलेले देयक, याची चौकशी केली जावी, अशी मागणी कायद्याने वागा लोकचळवळीचे रत्नागिरी तालुका समन्वयक विजयकुमार जैन यांनी यापूर्वी केली आहे. रकमेची वसुली कंत्राटदारांकडून करून ती कंत्राटी कामगार कायद्यातील कलम अन्वये कामगारांच्या बँक खात्यात जमा करावी, यांसाठी जिल्हाधिकारी तसेच पालिका प्रशासन संचालकांनाही निवेदन दिले होते. फेब्रुवारी २०१९ ला उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयानुसार, मनुष्यबळ पुरवठा कंत्राटाची देयके प्रमाणिक कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे.