गेले आठवडाभर चिपळुणात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चारच दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरातील बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले होते. संपूर्ण दिवस पुराचे पाणी कायम होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला होता. मात्र प्रांताधिकारी आकाश यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी उत्तम असे काम परिस्थिती हाताळली होती. त्यामुळे भीतीचे वातावरण दूर होऊन नागरिकांमध्ये सतर्कता निर्माण झाली होती.
पावसाचे धुमशान – पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली. सरीवर पडणारा पाऊस सोम वारपासून सलग पडू लागला आणि मध्यरात्रीनंतर तर पावसाने अक्षरशः धुमशान घालण्यास सुरुवात केली. मंगळवारी पावसाचा जोर अधिक वाढला आणि पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला. परंतु वाशिष्ठी व शिव नदीने इशारा पातळी ओलांडली नव्हती. वाशिष्ठीची इशारा पातळी ५ मीटर असून धोक्याची पातळी ७ मीटर इतकी आहे. मात्र मंगळवारी दुपारपर्यंत ४.६० मीटर इतकीच वाशिष्ठीची पातळी राहिली होती. त्यावेळी बाजार पुलाजवळील मच्छी मार्केट परिसरात काहीसे पाणी शिरले होते. नंतर लगेचच ते ओसरले देखील.
पावसाची दोन हजारी पार – चिपळुणात सोमवार व मंगळवार सकाळी ८ वाजेपर्यंत पर्यंत २४ तासात १०५ मी.मी इतका पाऊस पडला आहे. तर आद्यपपर्यंत एकूण १९१३.९७ मी.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.मात्र मंगळवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूणात पावसाने दोन हजाराचा टप्पा पूर्ण केला आहे.
प्रशासन सतर्क – पावसाचें रौद्ररूप पाहता प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी तात्काळ यंत्रणा सज्ज करून आपत्ती निवारण पथके यंत्रसामुग्रीसह तैनात केली होती. तसेच स्वतः बाजारपुल व अन्य ठिकाणी पाहणी करून शहरात गस्त देखील घालत होते. विशेष म्हणजे सोशलमीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत योग्य अशी माहिती पोहचवण्याचे काम देखील करण्यात येत होते.
पावसाचा जोर कायम – मंगळवारी सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. मात्र पुराचे पाणी शिरले नव्हते. गाळ काढल्यामुळे नदीची वहन क्षमता वाढल्याने पाण्याचा प्रवाह वेगाने सुरू आहे. त्यामुळे पुराच्या पाण्याचा धोका कमी झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुराचे पाणी भरले नसले तरी व्यापारी मात्र सतर्क झाले असून त्यांनी आपले समान अगोदरच सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. तर शहरात नगरपालिका कर्मचारी व एनडीआरएफ महसूल तर ग्रामीण भागात महसूल व एनडीआरएफ अशी पथके तैनात करण्यात आली आहेत.