जानेवारी २०२४ मध्ये मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण होईल, असे केंद्रीयमंत्री नाम. नितीन गडकरी यांनी सांगितले असून, युद्धपातळीवर काम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र सध्या या कामासमोर असलेल्या अडचणी लक्षात घेता आरवली ते काटे आणि काटे ते वाकेड या दोन टप्प्यातील कामांना गती देण्याची गरज असून हे काम करणाऱ्या कंपन्यांच्या खात्यात पैसे जमा झाले तरच डिसेंबर २०२३ पर्यंत एक लेन (एकेरी वाहतूक) पूर्ण होवू शकेल असे सांगण्यात येते आहे.पैशाअभावी काम अडल्याची चर्चा सुरु असून, काम करणाऱ्या कंपन्यांना वेळेत पैसा मिळाल्यास काम वेगाने मार्गी लागेल अशी चर्चा सुरु आहे. नाम. नितीन गडकरी यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली असून ते याबाबत काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे १० टप्पे करण्यात आले. त्यातील ६ वा टप्पा आरवली ते कांटे आणि ७वा टप्पा कांटे ते वाकेड हा मार्ग आहे. एकूण ९१ कि.मी.च्या या मार्गाचे काम गेली ६ वर्षे रखडले आहे. या दोन्ही टप्प्यातील रस्त्यांसाठी अंदाजे १४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्ची पडणार आहे. सुरुवातीला एमईपी कंपनीने हे काम हाती घेतले. त्यांनी काम पूर्ण केले नाही. म्हणून २ वर्षांनंतर हे काम रोडवेज सोल्युशन या कंपनीला देण्यात आले. या कंपनीने त्यापैकी आरवली ते काटे दरम्याच्या ५१ कि.मी. मार्गाचे काम सबठेकेदार म्हणून बी.के. म्हात्रे कंपनीला आणि काटे ते वाकेड हे ४० कि.मी.चे काम हॅम्स या कंपनीला दिले. दोन्ही कंपन्यांनी सुरुवातीला वेगाने काम सुरु केले. मात्र त्यानंतर पैसे देण्यात दिरंगाई होत असल्याने कामाची गती मंदावली, अशी चर्चा संबंधित विभागात सुरु आहे.
पैशाअभावी काम रखडल्याची बाब गुरुवारी रत्नागिरीत आलेल्या नितीन गडकरींच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. गडकरींनी ती मान्य केली असून कायदेशीर बाबींचा विचार करुन सध्या काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला कामाचे पैसे थेट कसे मिळतील याबाबत विचार करण्यात येईल, असे म्हटले आहे. सध्या आरवली ते काटे या मार्गाचे २७ टक्के काम झाले असून काटे ते वाकेड या टप्प्यातील २५ टक्के काम झाले आहे. पैसे वेळेवर मिळाले तर हे काम वेगाने मार्गी लागेल आणि दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण होईल. डिसेंबर २०२३ अखेर हे काम पूर्ण होवू शकेल असा विश्वास व्यक्त होतो आहे. दरम्यान, १० टप्प्यांपैकी ७ टप्प्यांचे काम बाकी असून ते वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना गडकरींनी दिल्या आहेत. आरवली ते काटे या टप्प्यात अंडरपासच्या ११ प्रस्तावांना मंजूरी दिल्याचे गडकरींनी सांगितले.